फडणवीसांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास, टीका मात्र ठाकरे सरकारवर

| Updated on: Jan 27, 2021 | 10:21 PM

मी आज दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. | Devendra Fadnavis

फडणवीसांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास, टीका मात्र ठाकरे सरकारवर
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
Follow us on

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कारशेडच्या वादामुळे रखडलेल्या मेट्रो-3 च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चिमटाही काढला आहे. (Devendra Fadnavis take a dig at Thackeray govt over Metro 3 Mumbai)

मी आज दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

त्यामुळे आता महाविकासआघाडीकडून देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मेट्रो-३ मार्गिकेच्या आरे कारशेडचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवला होता. या कारशेडसाठी आरेतील झाडांची रातोरात कत्तल करण्यात आल्यानंतर एकच जनक्षोभ उसळला होता.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कांजूरमार्ग येथील जागा मिठागाराची असल्याचे सांगत केंद्र सरकारने त्यावर दावा केला होता. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता महाविकासआघाडी सरकार कारशेडसाठी पर्यायी जागेच्या शोधात आहे.

सत्यजित तांबेंचा फडणवीसांवर पलटवार

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोच्या प्रवासाचे निमित्त करून महाविकासआघाडीला चिमटा काढल्यानंतर काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी त्यांना ट्विटवरून लगेच रिप्लाय दिला. देवेंद्र भाऊ तुम्ही आज ज्या दिल्ली मेट्रोने प्रवास केलात ती काँग्रेसच्या काळात सुरु झाली होती. मुंबई मेट्रोही काँग्रेसच्याच कार्यकाळात सुरु झाली. त्यामुळे सकारात्मक राहा. लवकरच मुंबई मेट्रोच्या सर्व मार्गिकांचे बांधकाम पूर्ण होईल, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

Special Report | मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, कोण नाक दाबणार, कुणाचं तोंड उघडणार?

(Devendra Fadnavis take a dig at Thackeray govt over Metro 3 Mumbai)