क्रिस्टल कंपनी भाजपच्या प्रसाद लाड यांची, त्यात गिरीश महाजन यांचा स्टेक..प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाचा दावा काय?
Sujat Ambedkar : "दलीत संघटना आमच्या सोबत काम करतात संपर्क असतो. मातंग समाजामधील आणि इतर संघटनेतील लोक त्यांना त्यांच्या समाजासाठी भूमिका घ्यायची आहे. उपवर्गीकरणाविरोधात त्यांनी भूमिका मांडलेली आहे. मातंग समाजातील लोकांनी त्यांच्या लोकांना सत्तेत बसविले. सहभागी करून घेतले आहे. त्यांनी समाजासाठी आता भूमिका घ्यावी" असं सुजात आंबेडकर म्हणाले.

“नाशिकमध्ये तीन मोठी प्रकरणं समोर आलेली आहेत. यामुळे नाशिकला गालबोट लागले आहे. TCS प्रकरणात भाजपच्या लोकांनी ही माहिती पुरविली. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. भाजपच्या सांगण्यावरून पोलिस इन्व्हिस्टेशन करतात. अद्याप या प्रकरणात ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. बाहेरचे फंडिंग होते का? हे देखील समोर आलेले नाही. पोलिसांनी कुठलेही पुरावे न बघता, भाजपच्या माहितीच्या आधारे काम केले, यावर आमचा आक्षेप आहे. एक narrative सेट करण्यात आला. ज्यातून पुढे जाऊन हिंदू-मुस्लिम रंग याला देण्यात आला” असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. ते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आहेत.
“दुसरे प्रकरण नीट पेपर फुटीचे आहे. नीट पेपर फूट प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आले. मात्र यात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचे नुकसान होते. एक पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे करिअर पाण्यात जाते. भोंदू बाबा खरात याचे तिसरे प्रकरण आहे. त्यांच्या स्वीय सहायकाचा अपघात झाला, यावर संशय व्यक्त होतो. यात ज्या मंत्र्यांचा सहभाग आला, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. खरात याला जेल मध्ये मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो.मंत्र्यांना वाचविण्यासाठी खरात याला जेल मध्ये मारले जाईल” असे आरोप सुजात आंबेडकर यांनी केले.
कुंभमेळ्यासाठी उपजीविकेचे साधन तोडून टाकले जात आहे
“तपोवन मुद्दा एक महत्वाचा आहे. तपोवन वाचले पाहिजे. कितीतरी लोकांचे जीवन हातगाड्यावर आहे. शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने कुंभमेळ्यासाठी बळकविण्यात आली आहे. उपजीविकेचे साधन तोडून टाकले जात आहे कुंभमेळ्यासाठी. पोलिसांकडून यात हस्तक्षेप केला जात आहे, आंदोलन मोडीत काढले जात आहे. संपूर्ण नाशिक खोदून ठेवलेले आहे. त्यात ठेकेदारांना काम दिलेले आहे” असे आरोप सुजात आंबेडकर यांनी केले.
भाजपच्या स्क्रिप्ट वरून हे काम केलं
“TCS प्रकरणात पोलिसांनी भाजपच्या स्क्रिप्ट वरून हे काम केलं आहे. हिंदू-मुस्लिम वाद यांना उभा करून भांडणं लावायची आहेत. याचा पारदर्शक तपास व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे” असं सुजाब आंबडेकर म्हणाले.
त्या कंपनीत गिरीश महाजन यांचे स्टेक
“शिक्षण व्यवस्था सरकारने विकायला काढली आहे. शिक्षणाचे खाजगीकरण या सरकारला करायचे आहे. शेतकऱ्यांचा, वंचितांचा पुढे जाण्यासाठी शिक्षण एक मार्ग आहे. मात्र त्याचे व्यावसायिकरण झाले आणि वंचित घटक यातून मागे कसा पडेल हा सरकारचा डाव आहे. शिक्षणा संदर्भातली अनेक कामं क्रिस्टल कंपनीला दिली, ती कंपनी भाजपचे प्रसाद लाड यांची आहे. त्यात गिरीश महाजन यांचे स्टेक आहेत. युजीसी बजेट कमी केलं जातं, हे सगळे प्रसंग बघितले तर शिक्षण व्यवस्था थांबवून वंचितांच्या मुलांना शिक्षणापासून रोखत आहे” असा आरोप सुजात आंबडेकर यांनी केला.