‘काही लोकांनी प्रतिष्ठा पणाला लावली, तरीदेखील भाजपला यश’, गणपत गायकवाडांचा शिवसेनेला टोला

| Updated on: Jan 18, 2021 | 8:53 PM

काही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, तरीदेखील भाजपला चांगले यश मिळाले, असा टोला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी लगावला. (BJP MLA Ganpat Gaikwad on Gram panchayat election result 2021)

काही लोकांनी प्रतिष्ठा पणाला लावली, तरीदेखील भाजपला यश, गणपत गायकवाडांचा शिवसेनेला टोला
Follow us on

कल्याण (ठाणे) : काही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, तरीदेखील भाजपला चांगले यश मिळाले, असा टोला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी लगावला. अंबरनाथ तालुक्यात आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या 9 ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती महाविकास आघाडी, चार ग्रामपंचायती भाजप तर एक ग्रामपंचायत मनसेला मिळाली आहे. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “काही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लवाली होती. तरीदेखील भाजपला चांगले यश मिळाले. काय फायदा झाला?”, असा सवाल गणपत गायकवाड यांनी केला (BJP MLA Ganpat Gaikwad on Gram panchayat election result 2021).

“कल्याण पूर्व मतदारसंघात नऊ ग्रामपंचायती होत्या. यापैकी चार भाजप, चार महाविकास आघाडीचे तर एका ग्रामपंचायतीवर मनसेचा विजय झाला आहे. भाजपचा चांगल्या मतांनी विजय झाला आहे. कारण तीन पक्ष एकत्र लढून चार जागा मिळाल्या आहेत”, असं गणपत गायकवाड म्हणाले (BJP MLA Ganpat Gaikwad on Gram panchayat election result 2021).

खरंतर ग्रामपंचायत निवडणुकीला प्रतिष्ठेची निवडणूक बनवणं योग्य नव्हतं. तरी काही पक्षाच्या लोकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. खरंतर असं करु नये. ग्रामपंचायत निवडणुकीत टोकाची भूमिका घेऊन लढलं नाही पाहिजे. पण यामध्ये भाजपचा नक्की विजय होईल”, असा दावा गणपत गायकवाड यांनी केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

राज्यात सध्या जवळपास 80 टक्के निवडणुकींचा निकाल समोर आला आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसत आहे. यामध्ये सध्या भाजप सर्वात पुढे असल्याचं सध्या चित्र आहे. त्यापाठोपाठ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आहे. मात्र, महाविकास आघाडीचा एकंदरीत निकाल पाहिला तर त्यासमोर भाजपचा पूर्णपणे धुव्वा उडाल्याचं चित्र आहे.