Jayant Patil: सध्या भाजपकडून मनसेचा वापर सुरू; राज ठाकरे यांच्या सभेआधीच जयंत पाटलांनी डिवचलं

| Updated on: Apr 11, 2022 | 4:15 PM

Jayant Patil: मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली.

Jayant Patil: सध्या भाजपकडून मनसेचा वापर सुरू; राज ठाकरे यांच्या सभेआधीच जयंत पाटलांनी डिवचलं
राज ठाकरे यांच्या सभेआधीच जयंत पाटलांनी डिवचलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची उद्या ठाण्यात सभा होणार आहे. त्या आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा (mns) फक्त वापर चालू आहे, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली. मनसेची तशीही मते भाजपला मिळणार नाहीत म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजप घाबरत आहे. भाजपची मनसेला जवळ करण्याची पूर्वीपासूनची फार इच्छा आहे. पण अजून त्यांनी ते धाडस केलेले नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या ठाण्यात सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी माध्यमांनी त्यांच्या बंगल्यावर संवाद साधला. पवारसाहेबांच्या घरावरील हल्ला आणि मनसे-भाजपची परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले. आंदोलनाला खतपाणी कुणी घातले… त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली… न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते… याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

योग्य ती कारवाई करू

पवारसाहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत आहेत. या प्रकरणी ते योग्य ती कारवाई करत आहेत. या प्रकरणाचा तपास कोणत्या स्टेजला आला आहे याचा नक्की तपशील माहीत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. पवारसाहेबांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितलं.

दूध का दूध पानी का पानी होणारच

मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का ? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का?, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी पवारसाहेबांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. पवारसाहेब नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले असेही ते म्हणाले. आता सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. दूध का दूध पानी का पानी होणारच पण यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

Pravin Darekar : आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही, मात्र चौकशीच्या आड छळवाद सुरू-प्रवीण दरेकर

Kirit Somaiya : राजभवनाचे बँकेत खाते नव्हते म्हणून पक्षाला ‘सेव्ह विक्रांत’चा निधी दिला; वकिलाची कोर्टात धक्कादायक माहिती

Kirit Somaiya : ‘कर नाही तर डर कशाला’? सोमय्या दोन दिवसांपासून कुठे गायब?-काँग्रेसचा सवाल