गणेशोत्सव काळात भाजपचे ‘साकडे आंदोलन’, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठाकरे सरकारला सद्बुद्धी देण्याचं मागणं

आता अत्याचाराविरुद्धच्या संघर्षात लढण्यासाठी बळ देण्याचं साकडं भाजपच्या वतीनं गणपतीसमोर घालण्यात येणार आहे. उद्या गणेशोत्सवाच्या आरंभाचं निमित्त साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीनं राज्यातील विविध शहरांमध्ये 'साकडं आंदोलन' केलं जाईल.

गणेशोत्सव काळात भाजपचे साकडे आंदोलन, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठाकरे सरकारला सद्बुद्धी देण्याचं मागणं
महिला अत्याचाराविरोधात कारवाई होत नसल्याचा भाजप महिला आघाडीचा राज्य सरकारवर आरोप
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 2:51 PM

औंरंगाबाद: जन्माष्टमीच्या दिवशी राज्यभरात मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपने आता गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) काळात महिला मार्चाच्या वतीनं पुन्हा एकदा राज्यभरात ‘साकडं आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये महिला मोर्चाच्या वतीनं गणपतीसमोर महिला अत्याचाराविरुद्ध कारवाई न करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरु असून सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत नाही, त्यामुळे आता महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार. असा पवित्रा भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अत्याचाराविरुद्धच्या संघर्षात लढण्यासाठी बळ देण्याचं साकडं भाजपच्या वतीनं गणपतीसमोर घालण्यात येणार आहे. उद्या गणेशोत्सवाचं  निमित्त साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीनं राज्यातील विविध शहरांमध्ये ‘साकडं आंदोलन’ केलं जाईल, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी (Savita Kulkarni  BJP Mahila Morcha’s state general secretary) यांनी दिली.

पुण्यातील सामुहिक बलात्कारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यात वानवडी येथे १४ वर्षांची अल्पवयीन बालिका आणि २५ वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना ठाकरे सरकार मात्र कोरोनाच्या नावाने राजकारण करत निष्क्रीयपणे घरात बसून आहे.
पुरोगामी महाराष्ट्रातील वानवडी येथील गौरी गायकवाड नावाच्या महिला सरपंचास सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्यानंतरही कारवाई होत नाही, उलट नागरिकांची लसीकरणाची सुविधाच बंद करून जनतेच्या जिवाशी खेळ केला जातो. औरंगाबादला उसतोड मजूर महिलेचे अपहरण केले जाते, आणि सरकार मात्र हातावर हात ठेवून ढिम्म राहते. ठाण्यात पालिकेच्या अधिकारी महिलेवर भर रस्त्यात हल्ला करून तिची बोटे छाटली जातात. महाराष्ट्रात विकृत गुन्हेगारांची हिंमत वाढली असून महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारी कृपेने गुन्हेगारी करणाऱ्यांशी संघर्ष करण्याची हिंमत गणरायाने राज्यातील महिलांना द्यावी अशी प्रार्थना भाजपच्या वतीने बंद मंदिरासमोर करण्यात येईल.

घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढल्याचे आरोप

कोरोनाकाळात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवरही अत्याचार झाले असून अशा वाढत्या घटनांमुळे महिलांनी घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली आहे. जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही. घरबसल्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे पाहात निष्क्रिय राहिलेल्या ठाकरे सरकारला आता गणरायानेच सुबुद्धी द्यावी, अशी मागणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने करणार येणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. तसेच गणरायाच्या थेट मुखदर्शनावरही बंदी घालणारे ठाकरे सरकार सण आणि उत्सवांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले आहे. घरात बसून स्वतःचे तोंड लपविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का, असा सवालही त्यांनी केला.

इतर बातम्या- 

ऊसतोडणीला नकार दिला म्हणून मजूर महिलेचं अपहरण, मुकादमाविरोधात गुन्हा

…तर अंधारात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, नाशकातली मंडळे आक्रमक, पालिकेला इशारा