सोशल मीडियावर चर्चा लग्नाच्या पत्रिकेची, चक्क ३६ पानांच्या लग्नपत्रिकेत दडलंय काय?

ईशिता मयूरच्या विवाहापर्यंत कल्पकतेने ही पत्रिका साकारण्यात आली आहे. ही पत्रिका एक प्रकारे वैचारिक मेजवानीच ठरत आहे.

सोशल मीडियावर चर्चा लग्नाच्या पत्रिकेची, चक्क ३६ पानांच्या लग्नपत्रिकेत दडलंय काय?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 20, 2023 | 4:41 PM

बुलढाणा : काही दिवसांपूर्वी लग्राचा करारनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दुसरीकडे सत्यशोधक विवाह, शिवविवाह, नोंदणी पद्धतीने विवाह असे पर्याय देखील अनेक जण स्वीकारत असतात. त्यातच आता बुलढाण्यात निवृत्त झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरली. 36 पानांची लग्नाचं आवतण देणारी एक पत्रिका सध्या महाराष्ट्राच्या पुरोगामी सांस्कृतिक पटलावर चर्चेची ठरत आहे.

शिवविवाह सोहळा अशी ही पुस्तक पत्रिका आहे. पाषाणातील पुरोगामी शिल्पांना चित्राच्या माध्यमातून स्थान देण्यात आले. शिव-पार्वती विवाहापासूनचा हा शिवप्रवास सामाजिक उत्थानाचे कार्य केलेल्या दाम्पत्याच्या ऐतिहासिक नोंदी येथे आहेत. ईशिता मयूरच्या विवाहापर्यंत कल्पकतेने ही पत्रिका साकारण्यात आली आहे. ही पत्रिका एक प्रकारे वैचारिक मेजवानीच ठरत आहे.

बुलढाण्यातील साहित्यिक गणेश निकम म्हणाले, साधारणतः लग्नपत्रिका म्हटलं की, परिवाराची नावं दिसतात. ३६ पानांची लग्नपत्रिका आहे.पण, त्याशिवाय हा लग्नाचा इतिहास आहे. लग्नपत्रिकेवरील एकप्रकारचं पुस्तक आहे.

लग्न पत्रिकेत नेमकं काय?

लग्नपत्रिकेची सुरुवात वेरुळच्या शिल्पावरून झाली आहे. जिजाऊंनाही पहिल्या पानावर घेण्यात आलंय. दुसऱ्या पानावर त्यांनी आवतण दिलंय. या पत्रिकेत शिव-पार्वती महाराणी देवी-सम्राट अशोक, संत सोयराबाई-चोखामेळा, जिजाऊ-शाहजीराजे, आवली-संत तुकाराम, सईबाई-छत्रपती शिवराय, सखी राज्ञी येसूबाई-छत्रपती संभाजी यांच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे.

तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई-महात्मा ज्योतिबा फुले, महाराणी चिमणाबाई-महाराजा सयाजीराव गायकवाड, महाराणी लक्ष्मीबाई-राजर्षी शाहू महाराज, रयतमाऊली लक्ष्मीबाई-कर्मवीर भाऊराव पाटील, रमाई-डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विमलाबाई-डॉ. पंजाबराव देशमुख, कॅप्टन लिलाताई- सेनाना डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे.

कालजयी महानायिका जिज्ञासक महदंबा, संत जनाबाई, संत मुक्ताई, अक्कमहादेवी, संत बहिणाबाई पाठक, केळदीची राणी चन्नम्मा, महाराणी ताराबाई, सरसेनापती उमाबाई दाभाडे, महाराणी अहिल्यादेवी होळकर, वीर झलकारी, फातिमाबी शेख, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, डॉ. रखमाबाई राऊत, बहिणाबाई चौधरी, सरोजिनी नायडू यांच्याबद्दलही माहिती या लग्नपत्रिकेत दिली आहे.

जीवनसुक्ते, शिवभूमीतील डोंगरे कुटुंबीय, प्रागतिक विचारांचे शिखरे परिवार, त्यानंतर नवरा-नवरी परिचय दिला आहे. हा विवाह सोहळा २३ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता औरंगाबाद येथील हॉटेल अॅम्बेसेडर अजंता लॉन येथे होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us