
महाशिवरात्रीच्या पवित्र दिनानिमित्त शिवशंभूच्या दर्शनासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या उत्साहावर काळाने घाला घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा नजीक शिवभक्तांचे वाहन उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. भूषण विजय दोडके (रा. पाटाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील पाटाळा परिसरातील शिवभक्त एका मालवाहू वाहनाने भटाळा येथील प्रसिद्ध शिव मंदिरात त्रिशूळ घेऊन दर्शनासाठी गेले होते. महादेवाचे दर्शन घेऊन परत येत असताना, हे सर्वजण वाटेत असलेल्या राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात होते. या प्रवासादरम्यान, पाटाळा जवळील राळेगाव परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे भाविकांनी भरलेले हे वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. वाहनाचा वेग आणि प्रवाशांची संख्या यामुळे हा अपघात अत्यंत भीषण होता.
या अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहनाखाली दबलेल्या भाविकांना बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेत टाकण्यात आले. यावेळी सर्व काही जखमींना सुरुवातीला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात (Civil Hospital) हलवण्यात आले आहे. यातील उर्वरित ५ जणांवर वरोरा येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मयूर वनशिंगे (१६), राजू किसन शिवरकर (४२), राजू जाधव (४०), मंथन डाहूले (१३), लकी भडके (२०), नानाजी मरस्कोल्हे (७०), गणेश खापणे (४०), मारोती शिवरकर (४५), विनोद गौरकर (५०), रोशन माडवे (१७), मारोती बदखल (५०) आणि सोहम भोयर (१६), प्रवीण आवारी, गुरुवेश राजेश जाधव (१४), ओंकार शिवशंकर मांढरे (९), प्रतीक पारखी आणि रोहित झाडे.
ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या अपघातामुळे पाटाळा आणि राळेगाव गावांत अत्यंत दु:खद वातावरण आहे. भूषण दोडके या तरुण मुलाच्या मृत्यूने दोडके परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. यावेळी मालवाहू वाहनातून प्रवाशांची ने-आण करण्याच्या धोक्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.