मित्राच्या लग्नात बेभान होऊन नाचला… अचानक कोसळला अन्… आनंदाचे वातावरण झाले क्षणात शोकमय; चंद्रपूरमध्ये हळहळ
चंद्रपूरमध्ये एका 25 वर्षीय तरुणाचा मित्राच्या लग्नात डीजेवर नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अल्पेश दहागावकर यांच्याबाबतीत घडली. अचानक कोसळल्याने लग्नसोहळ्यात शोककळा पसरली. तरुण वयात वाढत्या हृदयविकाराच्या घटना चिंताजनक असून, बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या सवयी ही प्रमुख कारणे आहेत. स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

चंद्रपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मित्राच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. अल्पेश दहागावकर असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. अल्पेश लग्नाच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचतांना अचानक खाली कोसळला. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अल्पेशच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
अल्पेश दहागावकर हा मित्राच्या लग्नाच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचतांना अचानक खाली कोसळला. सुरुवातीला उपस्थितांना हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र काही वेळातच तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याला गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली असून आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. अल्पेश दहागावकर याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोस्टमार्टमचा अहवाल आल्यावर…
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, पोस्टमार्टमचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे नेमके कारण समजले जाणार आहे. दरम्यान, लहान वयातच तरुण मुलांना हार्ट अटॅक येणं ही चिंतेची बाब बनली आहे.
कमी वयात हार्ट अटॅक का येतो?
कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या मागे विविध कारणं आहे. बदलती जीवनशैली, जंकफूड, कोल्ड ड्रिंकचं सेवन, तळलेल्या पदार्थांचं सेवन, जेवणात मिठाचा अति वापर आणि साखर अति प्रमाणात खाण्याने अटॅक येतो. तसेच दारू, सिगारेटचं व्यसनही हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत असते. करियरचा तणाव, प्रेशर, झोप न येणं, अती व्यायाम आणि अनुवांशिकता यामुळेही अटॅक येतो. त्यामुळे तरुणांनी स्वत:ला तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. आपली जीवनशैली व्यवस्थित राहील याची काळजी घेतली पाहिजे. आणि ताणतणाव आला तर संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.