राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं चालत नाही, मग आता..चंद्रपूरवरुन शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

“उद्या अमित शहा यांचा फोन आला तर हे पळत दिल्लीला जातील, विमानाचीही वाट पाहणार नाहीत. बोलणं हा गुण संजय राऊत यांनी शरद पवारांकडून घेतलेला आहे”

राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं चालत नाही, मग आता..चंद्रपूरवरुन शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल
Uddhav Thackeray
| Updated on: Feb 10, 2026 | 1:56 PM

मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत आज अखेर धक्कादायक निकाल लागला. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच्या संगिता खांडेकर अवघ्या एका मताने महापौर झाल्या. चंद्रपूर महागनरपालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की सहन करावी लागणार आहे. चंद्रपूरच्या महापौर पदावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडले होते. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद दिल्ली दरबारी गेला होता. या वादामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी काही दगाफटका होऊ शकतो अशी भिती होती, ती खरी ठरली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपला आपला महापौर बनवण्यात यश मिळालं आहे.

ऐनेवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसला हात दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसला बहुमताचं गणित जुळवता आलं नाही. वंचित आणि MIM च्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीने चंद्रपुरात भाजपसाठी काही गोष्टी अजून सोप्या झाल्या. चंद्रपूरच्या या निकालावरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

आता यांच्याकडे नेमकं उत्तर काय आहे?

“चंद्रपूर महापालिकेत उबाठाच्या नगरसेवकांनी स्वमताने निर्णय घेतला आहे. मात्र मनसेचे नगरसेवक गेले की काहींचे पोट दुखते. राज ठाकरे यांची भेट घेतली तर त्यांना ते चालत नाही. आता यांच्याकडे नेमकं उत्तर काय आहे?” असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “उद्या अमित शहा यांचा फोन आला तर हे पळत दिल्लीला जातील, विमानाचीही वाट पाहणार नाहीत. बोलणं हा गुण संजय राऊत यांनी शरद पवारांकडून घेतलेला आहे”

आमचं वैचारिक वैर आहे

“आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडून गेलो, पण पक्ष संभाळला. मात्र यांना लाचारी करावी लागत आहे. कोणीतरी पदरात घ्यावं म्हणून त्यांची धडपड सुरू आहे,” अशी टीकाही शिरसाट यांनी केली.“अनेक वर्षे एका नेत्यासोबत काम केल्यामुळे नाव येतं. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा विरोध होता. आमचं वैचारिक वैर आहे आणि ते कायम राहणार आहे” असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.