विधानसभा निकालापूर्वीच शिंदेंचा पहिला मंत्री ठरला, या उमेदवाराला भरसभेत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

धाराशिवच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी मंत्रिपदाबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निकालापूर्वीच शिंदेंचा पहिला मंत्री ठरला, या उमेदवाराला भरसभेत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
एकनाथ शिंदे
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 08, 2024 | 6:28 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराला देखील वेग आला आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ते धाराशिवमध्ये शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचार सभेत बोलत होते.  उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून, घराघरांमध्ये आग लावणारी आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या सभेत बोलताना तानाजी सावंत यांना मंत्रिपदाचं देखील आश्वासन दिलं.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या या घणाघाती टीकेमुळे आता शिवसेना ठाकरे गट देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना मंत्रिपदाचं आश्वासन देखील दिलं आहे. तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरसभेत म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला.

दरम्यान दुसरीकडे विरोधक देखील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. पुण्यात बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली, अजित पवार यांनी पक्षाची साथ सोडत भाजपला पाठिंबा दिला, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. घरात जे मतभेद झाले, त्यामागे दिल्लीतील अदृश्य शक्तिचा हात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us