CM Uddhav Thackeray: कोविड घोटाळ्यापासून मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

| Updated on: Mar 25, 2022 | 5:33 PM

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जोरदार बॅटिंग केली. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर झालेल्या प्रत्येक आरोपांवर उत्तरे दिली.

CM Uddhav Thackeray: कोविड घोटाळ्यापासून मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
कोविड घोटाळ्यापासून मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विधानसभेत (vidhansabha) जोरदार बॅटिंग केली. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर झालेल्या प्रत्येक आरोपांवर उत्तरे दिली. अगदी कोव्हिड घोटाळ्याच्या आरोपापासून ते नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यापर्यंत रोखठोक भूमिका मांडतानाच विरोधकांना जोरदार फटकारेही लगावले. बसून बोललो म्हणजे जोर गेला असा कोणी अर्थ काढू नये. उठाबश्यानी ताकद वाढते. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या चर्चेला एका वाक्यात उत्तरं देता येणार नाही. काही मुद्द्याची आपण उत्तरे देतो. तर इतरांचीही नोंद घेतो. आज मी तळमळीने आणि मनमोकळं बोलणार आहे. मला खोटं बोलता येत नाही, अशी भाषणाची सुरुवात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्या अभिभाषणापासूनच सुरूवात केली. कोपरखळ्या, टोले, चिमटे काढत त्यांनी विरोधकांची पिसे काढली.

आरोप आणि उत्तरं

  1. दहिसरच्या भूखंडाचा आरोप झाला. याचा पाठपुरावा कोणी केला? 2011पासून महापालिकेत त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्यावर फडणवीसांची सही आहे. एक्झामिन आणि डू द नीडफूल, असा शेरा त्यांनी मारलेला आहे. त्यावेळचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे. त्यांचा उल्लेख केला तर चालेल ना. नाही तर केरळाचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारखं नाही होणार ना. मी विचारतो. मला माहीत नाही या गोष्टी. त्यांनी एक पत्रं लिहिलं होतं. अजोय मेहतांनी नाही म्हटलं का तर नाही. त्यांनी त्यावर टिप्पणी दिली आहे. त्या जमिनीची किंमत ठरवणारी यंत्रणा चंद्रकांत पाटील यांच्या खात्याकडे होती. नंतर त्या जमीनीचा वाद कोर्टात गेला. कंत्राटदार 900 कोटी मागत होता. त्याला 300 कोटी दिले. मनिषाताई चौधरी यांनी फोटो ट्विट केला होता हॉस्पिटलचा. आशिष नको म्हणतोय. पण तुम्ही सांगा तुमच्या वॉर्डाचा प्रश्न आहे, लोक विचारतील. मी तुमच्या बाजूचा आहे. हॉस्पिटल व्हावं ही सर्वांची भूमिका आहे. भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीत भालचंद्र शिरसाट यांनी ठेवला होता. दर ठरवण्याचं काम पालिका करत नाही. महसूल खातं करतं. पालिकेने ज्यादा दराला आक्षेप घेतला होता.
  2. कोविड भ्रष्टाचारावरही बोललं गेलं. महापालिकेने या काळात भरपूर काम केलं. कोविड काळात मोदींनी पक्षभेद विसरून सर्वांना समान मदत केली. मी कबूल करेल. त्याबाबत मी कद्रूपणा करत नाही. केंद्राने सेक्रेटरीचा गट तयार केला होता. त्यांनी पीपीई किट्स ऑक्सिजन दिले. ज्यावेळी गरज होती, त्यावेळी त्यांनी पुरवले. टेंडर काढले नव्हते. वाटाघाटी करून किंमती ठरवल्या होत्या. कोणी तरी बुडत असेल आणि दुसऱ्याला पोहता येत नसेल तर टायर आणि लाकूड देऊन वाचवण्याचा प्रयत्न होतं. ती त्यावेळची गरज असते. अशावेळीही टायरचं टेंडर काढणार का? काही तरी करतो ना. पालिकेने शॉर्ट टेंडर काढून काम केलं. धारावी वाचवली. सर्वांनी कौतुक केलं. केंद्राचं पथक यायचं. ते थरथरायचं. ते म्हणायेच काही करा पण धारावी वाचवा. पालिकेची यंत्रणा धारावीत उतरली. त्याचं कौतुक करू नका . पण घरच्या म्हातारीचा काळ होऊ नका.
  3. मी टीकेला आणि बदनामीला घाबरत नाही. पण कोणत्या थराला जायचं हा प्रश्न आहे. मलिकांचा राजीनामा मागितला गेला. तथ्य असेल तर करू ना. पण आरोपात तथ्य तर पाहिजे. चार चार पाचवेळा मलिक निवडून येतात. मंत्री बनतात. तरी केंद्राच्या यंत्रणांना माहीत राहत नाही. या यंत्रणा पोकळ झाल्या का? टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा एवढंच करतात का एजन्सी. या एजन्सी म्हणजे बाण आहे. हातात घ्यायचं आणि लक्ष्यावर मारायचं असं काम सुरू आहे. फडणवीस केंद्राने तुम्हाला रॉ किंवा सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे होते. ईडीला तुम्हीच माहिती दिली. असं वाचलं मी. ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही.
  4. हा दाऊद आहे कुठे माहीत आहे कुणाला? म्हणजे एखाद्या निवडणुकीसाठी विषय किती काळ घेणार. राम मंदिराचा विषय किती काळ घेतला. आधी रामाच्या नावाने मतं घेतली आता दाऊदच्या नावाने घेणार आहे का? दाऊद कुठे आहे माहीत आहे का? गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, दाऊदला फरफटत आणू. आता आपण दाऊदच्या मागे फरफटत जातोय. ओबामाने ओसामाच्या नावाने मते मागितली होती का हो. टॉवर पाडल्यानंतर ओबामाने वाट पाहिलं नाही. त्याने घरात घुसून लादेनला मारलं. याला म्हणतात मर्दपणा. आता दाऊदला घरात घुसून मारा. दाखवा हिंमत.
  5. आम्ही देशद्रोहाच्या विरोधात आहोत. त्याबाबत दुमत नाही. नवाब मलिकांचा राजीनामा मागता. काश्मीरात तुम्ही मुफ्तीसोबत सत्ता स्थापन केली. अफजल गुरूला फाशी देऊ नका, असं मुफ्तीचं विधान होतं. अफजल गुरूचं पार्थिव कुटुंबाला द्या, अशी मेहबुबा यांची मागणी होती. त्यावेळी सत्तेत भाजप होता. तुम्ही त्यांच्याशी सत्तेचा पाट मांडला होता. त्यावेळी त्यांची मते कशी होती?
  6. हर्षवर्धन पाटील त्यांना आधी झोप लागत नव्हती. नंतर त्यांनी झोपेचं औषध घेतलं. हा अनुभव त्यांनी कानात नाही सांगितला तो सभेत सांगितला. असं काय तुमच्याकडे झोपेचं औषध आहे?
  7. मध्ये मध्ये आरोप झाले. सुधीर भाऊ तुम्ही छान बोलता. मला उत्तर द्यावं लागतं. बेवड्यांचा महाराष्ट्र, मद्य महाराष्ट्र म्हणाला तुम्ही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे किराणा दुकानात मद्य मिळत नाही. ते सुपर मार्केटमध्ये मिळतं. मध्य प्रदेशला मद्य राष्ट्र का म्हणतात? देशात एकलाखापेक्षा कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहे. कर्नाटकात 7.10 टक्के, मध्य प्रदेश 5.07 टक्के, उत्तर प्रदेशात 2.60 टक्के, तेलंगणामध्ये 6.30 टक्के, तामिळनाडूत 9.30 टक्के दुकाने आहेत. हे सगळं बघितल्यानंतर लगेच राज्याची बदनामी करायची हे योग्य नाही. तुम्ही आमच्यावर टीका करा. राज्यपाल विकास काय हे सांगत होते. तेही तुम्ही समोर येऊ देत नाही. एक एक नाव देऊन राज्याला बदनाम करत असतात. टीका करा. पण कोणत्या टोकाला जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
  8. रावणाचा जीव हा बेंबीत होता. तसं काही जणांना केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव मुंबईत असतो. मुंबई बद्दल मला अभिमान आहे. मुंबईच्यासाठी जे करायचं ते करू.
  9. सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही? आम्ही तुमच्या गळ्यात पट्टा बांधला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही नाीच विकृत आणि निंदणीय गोष्ट आहे. मर्द असेल तर अंगावर ये, बघतो तू आहे आणि मी आहे. आता कळत नाही शिखंडी कोण आणि मर्द कोण. याला मर्दपणा म्हणत नाही. घराघरातील कुटुंबाला बदनाम करायचा. धाडी टाकायचा. मागे गडकरी म्हणाले, आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्यूमन लॉन्ड्रिंग सुरू केलंय का? म्हैसूर साबण लावायचा, बघा झाला स्वच्छ.
  10. फजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबूबा बाई भारत माता की जय, वंदे मातरम म्हटलं की काय असं वाटलं होतं. तसं झालं असतं तर आम्ही त्यांच्या दर्शनाला आलो असतो, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला. तुम्ही मुदस्सीर लांबेंचा विषय काढला. दाऊदचा माणूस म्हटलं. लांबे के लंबे हात म्हणाला. फडणवीसजी, तुम्ही दर्ग्यात त्यांच्यासोबत फोटो काढला हार घालताना. त्यावेळी तुमच्यासोबत क्रांतीकारक होते. माझा तुमच्यासोबत फोटो आहे, मोदींसोबत फोटो आहे. त्याने काय होत नाही. लग्नात फोटो काढला म्हणून संबंध जोडता येत नाही. लांबेंच्या नेमणुकीच्या पत्रावर सही हिरव्याशाहीत केली आहे. विनोद तावडे यांनी सही केली आहे. तो कागद आमच्याकडे आहे. या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. धर की ठोक करून चालणार नाही. एखाद्याला तू वाईट आहे सांगण्यापेक्षा तू किती चांगला आहे हे दाखवून द्यावं लागतं.

संबंधित बातम्या:

Udhav Thackrey on ED : ईडी आहे की घरगडी, देवेंद्रजी तुम्हाला केंद्रानं घेतलं पाहिजे, फडणवीसांच्या आरोपांवर सीएम सुसाट

CM Udhav Thackerey : रावणाचा जीव बेंबीत होता, काहींचा जीव मुंबईत, मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना थेट उत्तर

CM Uddhav Thackeray : तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरुंगात, उद्धव ठाकरेंचं भाजपला खुल्लं आव्हान