भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना चौकशी आयोगाचा समन्स

| Updated on: Oct 22, 2021 | 6:33 PM

भीमा कोरेगाव दंगल झाली तेव्हा रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या, तर परमबीर सिंग हे राज्य पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना चौकशी आयोगाचा समन्स
भीमा कोरेगाव
Follow us on

मुंबई : कोरेगाव-भीमा युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनी 1 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावला आहे. सिंग आणि शुक्ला यांना 11 नोव्हेंबर रोजी साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहे. भीमा कोरेगाव दंगल झाली तेव्हा रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या, तर परमबीर सिंग हे राज्य पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. (Commission of Inquiry summons Parambir Singh and Rashmi Shukla in Bhima Koregaon riots case)

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे 200 वर्षपूर्तीनिमित्त विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दलित बांधव एकत्रित जमले होते. काही समाज कंटकांकडून भीमा कोरेगाव येथे मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला त्याचे रुपांतर दंगलीत झाले. या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. या दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाने आता परमबीर सिंग आणि रश्मी शुकला यांना समन्स बजावलं आहे.

नेमकी कशी घडली दंगल?

– कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी 1 जानेवारी 2018 रोजी दलित समाजाचे लोक जमले होते. 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नागरिक जमले होते.

– विजय दिवस साजरा होत असतानाच काही समाज कंटकांकडून या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या.

– पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून हिंसक घटनांना सुरुवात झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

– घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभर या हिंसक घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.

इतिहास काय?

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांदरम्यान युद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष महार समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्यावेळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे. (The Battle Of Bhima Koregaon Poster Released)

हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं 28 हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं. यावेळी आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटीश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.

फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि पेशव्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर पेशव्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासावरच्या पुस्तकात सापडतो.

दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी अनेक जण हे महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटलं जातं. (Commission of Inquiry summons Parambir Singh and Rashmi Shukla in Bhima Koregaon riots case)

इतर बातम्या

भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबईत दहा वर्षात तब्बल 48,434 आगीच्या घटना, ठोस उपायोजनांची गरज