महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत असताना कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी यांचं निधन झाल्यास त्यांच्या पात्र वारसदारांना आता त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा नियुक्ती धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पात्र वारसांना संबंधित अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे धोरण आहे, मात्र, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे स्वायत्त मंडळ असल्याने या मंडळाला हा निर्णय लागू होत नव्हता. आज हा निर्णय लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच त्यासाठीचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा तत्व लागू करण्यात आले आहे.
या निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत असताना कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी यांचं निधन झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा धोरणानुसार शासकीय सेवेत त्यांच्या शैक्षणिक पात्रनेनुसार गट क किंवा ड मध्ये वक्फ मंडळात नियुक्ती मिळू शकेल. त्यासाठी पात्रता तारीख २१.०९.२०१७ अशी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या तारखेस किंवा त्यानंतर सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना मंडळात नियुक्ती मिळेल, तसंच ३१.१२.२००१ नंतर अशा कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य झालेले असल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा धोरण लागू होणार नाही. यासाठीचा शासन आदेश शासकीय संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे.