
“लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं. पण केलेलं मतदान कुठे तरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ताशेरे ओढले. ते आज मुंबईत बोलत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जण ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे.
“लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणुक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थानच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चालला आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे”, अशी साद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंना घातली आहे. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख केला.
“दर निवडणुकीत मला 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य राहिलं आहे. या वेळचा निकाल अनपेक्षित होता. जनतेलाही तो अनपेक्षित वाटला ही वस्तुस्थिती आहे. राज ठाकरे यांनी माझा उल्लेख केला. माझ्याबाबत नाही तर राज्यात अनेकांच्या बाबतीत हे संशयाच वातावरण आहे. जे दिसतंय ते वेगळं आणि घडलं मात्र वेगळं. या बाबतीत आम्ही अपील देखील केलं होतं. व्हीवीपॅट मोजण्याची मागणी केली होती. मात्र ते तयार नाहीत. फक्त ईव्हीएम मशीनचे आकडे दाखवणार असं सांगितलं. अनेक बंधने घातली जात आहेत. माहिती द्यायला तयार नाहीत. ही 100 टक्के संशयास्पद वस्तुस्थिती आहे”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
“जे लोकसभेनंतर 48 लाख मतदार वाढले, त्यावर देखील काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. जो पाच वर्षात वाढू शकत नाही तो तीन चार महिन्यात कसा वाढू शकतो. अनेक गोष्टी संशयास्पद आहेत. त्यावरच राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. मला राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल काही बोलायचं नाही. जे योग्य वाटलं ते बोलले. ती भावना त्यांचीच नाही तर राज्याची आणि देशाची सुद्धा आहे”, असेही बाळासाहेब थोरातांनी सांगितले.
“जर असं होणार असेल तर काय उमेदवार उभे करणार आपण. काय मतदान करायचं अस लोकांना वाटत आहे. ती काळजी देखील राज यांनी व्यक्त केली आहे. मात्र लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. सध्या लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थानच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चालला आहे. ईव्हीएमबाबत आम्ही सोबत उभे राहिलो आहे. जनआंदोलन उभ करण्यासारखी परिस्थिती आहे. लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.