कर्तव्य विसरला, पोलीस अधिकाऱ्याकडून विवाहितेवर अत्याचार आणि…

रक्षकच बनला भक्षक! पोलीस अधिकऱ्याकडून विवाहितेवर अत्याचार, पिस्तूलचा धाक दाखवत धक्कादायक प्रकार..., वर्दीतले रक्षकच भक्षक बनले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा?

कर्तव्य विसरला, पोलीस अधिकाऱ्याकडून विवाहितेवर अत्याचार आणि...
फाईल फोटो
| Updated on: Jul 24, 2025 | 8:58 AM

काहीही झालं तर आपण लगेच पोलिसांना मदतीसाठी बोलावतो. आपल्या आसपास कोणता गुन्हा घडत असेल तर, जबाबदार नागरीक म्हणून आपण पोलिसांना कळवतो. अगदी घरगुती प्रकरण असलं तरी पोलिसांना मदतीला बोलावतो. गंभीर वेळेत पोलीस धावून येतात. जनतेला ती पोलिसांनी केलेली मदत वाटते, पण ते पोलिसांचं कर्तव्य असतं. पण पोलीसच त्यांचं कर्तव्य विसरले तर…? सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

पण पोलीस अधिकाऱ्याकडूनच महिलेवर अत्याचार होत असेल तर… पोलिसांवर विश्वास ठेवणं देखील आता कठीण झालं आहे. असंच काही बीड तेथे घडलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे रक्षकच झाला भक्षक असं बोलायला काहीही हरकत नाही. पोलीस अधिकाऱ्याने विवाहित महिलेला पिस्तूलचा धाक दाखवत अनेकदा अत्याचार केले आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. संबंधित प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये कार्यरत असताना रविंद्र शिंदे आणि पीडित महिला यांच्यामध्ये ओळख झाली. ओळखीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

पण या प्रेमसंबंधाचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल अशी महिलेने कल्पना देखील केली नसेल. महिलेचा विश्वास केल्यानंतर आरोपीने महिलेला पिस्तूलचा धाक दाखवत स्वतः सोबत राहण्यास भाग पाडलं. दरम्यान आरोपीची बदली धाराशिव जिल्ह्यात झाली.

आरोपीची बदली झाल्यानंतर सर्वकाही थांबले असं महिलेला वाटलं. पण असं काहीही झालं नाही. बदली झाल्यानंतर देखील पिस्तूलचा धाक दाखवत पोलीस अधिकाऱ्याने महिलेवर अत्याचार केला. एवढंच नाही तर, शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देखली महिलेला दिली.

अखेर पोलीसाच्या जाचाला कंटाळून पीडितेने धाराशिव जिल्ह्यातसोबत राहण्यास नकार दिल्यानंतर प्रकार समोर आलं. याप्रकरणी सध्या शिवाजीनगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

सध्याची परिस्थिती पाहता देशाच्या कोणत्यात कोपऱ्यात महिला सुरक्षित नाहीत. आताच नाही तर, याआधी देखील पोलिसांनी महिलांवर अत्याचार केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. वर्दीतले रक्षकच भक्षक बनले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा? असा संतप्त सवाल नागरिकांनी याठिकाणी उपस्थित केला आहे.

Follow Us