हिंगोली : राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय राबवले जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातही 7 मार्चपर्यंत सकाळी 7 ते रात्री 12 या कालावधित कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक करावाई केली जाणार आहे. (curfew has been implemented in Hingoli up to seven march due to Corona Pandemic)
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये तर हा संसर्ग इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. राज्यात अमरावीत, यवतमाळ अशा ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी रात्रीची संचारबंदी आहे. त्यात हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आगामी सात मार्चपर्यंत सकाळी सात ते रात्रीचे 12 अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात ग्रामीण तसेच शहरी हद्दीतील सर्व व्यक्ती आणि वाहन प्रवासास मज्जाव करण्यात आला आहे.
तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आगामी 7 मार्चपर्यंत धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, महाविद्यालयं, मंगल कार्यालये, पेट्रोल पंप, आस्थापना, दुकाने, तसेच सर्व खानावळी बंद असतील. दुध विक्रीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुभा देण्यात आलीये.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मागील आठवडाभरापासून वाढणारे कोरोना रुग्ण पाहता यावर नियंत्रणासाठी केवळ लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे की इतर काही यावरही विचार केला जातोय. मात्र, सध्या तरी राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना हॉटस्पॉट सापडत आहेत तेथे कठोरपणे निर्बंध लादले जात आहेत. मात्र, सरसकटपणे लॉकडाऊन लावणं सरकार टाळत आहे. यामागे मागील लॉकडाऊन काळात विस्कटलेली आर्थिक घडी आणि सर्वसामान्यांचे हाल हाही दृष्टीकोन आहे. त्यामुळेच सध्या तरी राज्यात जेथे कोरोना हॉटस्पॉट तेथे निर्बंध असंच धोरण आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही याविषयी तज्ज्ञांमध्येही अनेक मतभेद आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा वेग पाहता काही जाणकारांनी पुढील एक ते दोन महिने कोरोना रुग्णांची ही वाढ कायम राहिल असं म्हटलंय. मात्र, ही कोरोनाची दुसरी लाट नसल्याचंच अनेकांचं मत आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून राज्य सरकारसोबतच नागरिकांनाही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या :
(curfew has been implemented in Hingoli up to seven march due to Corona Pandemic)