Cyclone in Maharashtra : तौत्के चक्रीवादळाचा वेग वाढला, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान; झाडं पडली, बत्ती गुल

| Updated on: May 16, 2021 | 10:34 PM

वाऱ्याचा वेग ताशी 130 मैलापर्यंत वाढल्याने मोठया प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उमळून पडणे, वीजेचे खांब आणि तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याचे प्रकार घडले.

Cyclone in Maharashtra : तौत्के चक्रीवादळाचा वेग वाढला, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान; झाडं पडली, बत्ती गुल
चक्रीवादळ
Follow us on

रत्नागिरी : गोव्यात थैमान घालणाऱ्या तौत्के चक्रीवादळानं आता गती घेतलीय. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय. त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दुपारी साधारण 12 च्या सुमारास वादळाने रत्नागिरी जिल्हयात प्रवेश केला. त्यानंतर वाऱ्याचा वेग ताशी 130 मैलापर्यंत वाढल्याने मोठया प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उमळून पडणे, वीजेचे खांब आणि तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याचे प्रकार घडले. प्राथमिक माहितीनुसार रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात काही घरांची पडझड झाली आहे. तर कुठलीही जीवितहानी झाल्याची बातमी समोर आलेली नाही. (cyclone intensified heavy damage in ratnagiri, sindhudurga district)

रत्नागिरी जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलेल्या नियोजनामुळे राजापूर तालुक्यात कच्च्या घरात राहणाऱ्या 652 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होतं. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास वाऱ्याचा वेग 120 किमी प्रती तास वाढण्याचा अंदाज होता. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम प्रशासनाने केले. रत्नागिरी शहर, राजापूर तालुका, साखरीनाटे, आंबोळगड, मुंबई-गोवा महामार्ग तसंच किनाऱ्यालगतच्या गावात मोठया प्रमाणावर पोफळी, नारळाची झाडे पडली. या चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झालंय.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग तालुक्याला वादळाचा फटका

तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी तालुक्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तालुक्यातील एकूण 104 गावांमधील 800 ते 1 हजार घरांची पडझड झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात बसलाय. दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत झालाय. रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण, वेंगुर्ले या भागातील बत्ती गुल झालीय. काही ठिकाणी सकाळपासून तर काही ठिकाणी दुपारपासून वीज नाही.

6 हजार 500 पेक्षा जास्त नागरिक स्थलांतरित

रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 तर रायगड जिल्ह्यातील 2 हजार 500 नागरिकांचा समावेश आहे. तशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. तौत्के चक्रीवादळ आज रात्री उशिरा रायगड किनारपट्टीवर धडक देईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. त्यामुळे किनारपट्टी लगतच्या भागातील नागरिकांचं स्थलांतर सुरु आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्त्यातील 1600 लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.

गोव्यात दोघांचा मृत्यू

गोव्यात तौक्ते वादळामुळे प्रचंड दाणादाण उडाली आहे. या वादळामुळे गोव्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात विजेचा खांब पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याचा मृत्यू झाड अंगावर पडल्याने झाला आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच मच्छिमारांनाही सावध राहण्याचा आणि समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Photo : तौक्ते वादळाचं रौद्ररुप, गोव्यात दाणादाण तर गुजरातमध्ये एनडीआरएफ सज्ज

Cyclone in Maharashtra : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील 6 हजार 500 पेक्षा जास्त नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित, प्रशासनाची खबरदारी

cyclone intensified heavy damage in ratnagiri, sindhudurga district