
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. बारामती विमानतळाजवळ झालेल्या खाजगी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे जाणारे त्यांचे लिअरजेट ४५ (Learjet 45) हे विमान उतरत असताना कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातात विमानातील वैमानिकांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. सध्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अजित पवार आज सकाळी मुंबईहून एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी बारामतीच्या दिशेने निघाले होते. त्यांचे खासगी विमान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या तयारीत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. धावपट्टीपासून काही अंतरावरच विमानाने पेट घेतला. त्यानंतर ते जमिनीवर आदळले. यानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीची तीव्रता एवढी भीषण होती की कोणालाही वाचवता आले नाही.
अजित पवारांच्या निधनानंतर असंख्य कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. आता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन कुठे करता येणार आणि त्यांचे अंत्यसंस्कार कुठे होणार याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. आज बुधवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज रात्री उशिरापर्यंत नागरिकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल.
यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. यानंतर सकाळी ११ च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी सध्या बारामतीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासकीय आणि कौटुंबिक पातळीवर वेगाने तयारी सुरू आहे. एकीकडे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात नियोजनाची तयारी केली जात असताना, दुसरीकडे अजित दादांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतही हालचालींना वेग आला आहे. काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थानाशेजारील स्वतःच्या शेतात संपूर्ण जमीन नांगरून आणि सपाटीकरण करून जागा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अंत्यसंस्कारासाठी नेमकी कोणती जागा निवडायची याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब घेणार आहे.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच लोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या निधनामुळे बारामती आणि बीड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून सर्व सरकारी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.