कुणाला घराकडे परतायचं होतं, तर कुणी अचानक ब्रेक मारला… तीन अपघात; नवरा, बायको आणि मुलाचा मृत्यू
महाराष्ट्रात अलिकडच्या काळात रस्ते अपघातांची मालिका सुरू आहे. जालन्यात वाळूच्या टिप्परमुळे पाच मजुरांचा मृत्यू झाला, तर समृद्धी महामार्गावर अपघातात सहा जण जखमी झाले. रत्नागिरी-नागपूर रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एका कुटुंबातील तीन जण ठार झाले आणि गोंदिया येथे ट्रक अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हे अपघात राज्यात सुरक्षेबाबत चिंता निर्माण करत आहेत.

राज्यभरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. जालन्यामध्ये वाळूच्या टिप्परमुळे 5 मजुरांचा मृत्यू झाला. वाळू रिकामनी केल्याने गाढ झोपेत असलेल्या मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातात काळाने अनेकांवर घाला घातला. प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या मुंबईतील नागरिकांचा अमरावतीत समृद्धीवर अपघात होऊन 6 जण गंभीर जखमी झाले. तर रत्नागिरी- नागपूर मार्गावर भोसे जवळ चारचाकी आणि दुचाकीचा मध्यरात्री जोरदार अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये नवरा , बायको आणि अवघ्या 1 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी भरधाव वेगात येत असलेला ट्रक समोरच्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात चालक व वाहक ठार झाले. अपघातांची मालिका राज्यात सुरूच असून नागरिकांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या मुंबईतील नागरिकांचा समृद्धीवर अपघात..
प्रयागराजला जाणाऱ्या मुंबईतील नागरिकांचा अमरावतीत समृद्धी मार्गावर अपघात झाला. यामध्ये 6 प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील चॅनेल नंबर 114 जवळ हा अपघात झाला. जखमींना उपचांरासाठी तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. धामणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अमरावती रेफर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कार-बाईकची धडक, नवरा-बायकोसह 1 वर्षाचा मुलगा ठार
तर त्नागिरी- नागपूर मार्गावर भोसे जवळ चारचाकी आणि दुचाकी गाडी मध्ये मध्यरात्री जोरदार अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील तिघे मृत्यूमुखी पडले. त्यामध्ये नवरा बायको आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ऊस तोड कामगार होते. ऊसतोड हंगाम संपल्याने हे जोडपं लहान मुलासह दुचाकीवरून परत गावी जात असताना मध्यरात्री भोसे गावाजवळ हा अपघात झाला. घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ट्रकच्या धडकेत दोन ठार…
अपघाताची आणखी एक घटना राज्यात घडली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी भरधाव वेगात येत असलेला ट्रक समोरच्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात चालक व वाहक ठार झाले. मासुलकसा घाट जवळील घटना, चालक साजिद खान (30) व वाहक सादाब खान (28) अशी मृतांचे नावे आहेत. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (53) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असून मसुलकसा घाटातही काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. तेव्हा नागपूरकडून रायपूरकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक CG 04 JD 8049 च्या चालकाने अचानक ‘ब्रेक’ मारला.
अशात मागे भरधाव वेगात येत असलेला ट्रक क्रमांक RJ 14 GH 1889 त्यावर जाऊन धडकला. ही धडक एवढी जोरदार होती की ट्रकचालक साजिद खान व वाहक सादाब खान हे दोघे ठार झाले. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यापासून कोहमारा ते देवरीदरम्यान आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांना जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करत आहेत.
