नुसता सांगाडा दिसला अन् बाप ढसाढसा रडला… सर्व गहिवरले, दीड महिन्यानंतर का काढला मृतदेह? अख्ख्या जिल्ह्यात चर्चा
आपल्या मुलाच्या मृत्यू मागे घातपात असल्याची शक्यता वडील नवल पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला आहे.

आपल्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलाचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्याचे वडील नवल पाटील यांना जेवण जात नव्हते. त्यांनी आपल्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असून त्याला क्रिकेट बॅटने मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळण्यासाठी त्यांच्या मृतदेहाची पुन्हा तपासणी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज अडीच महिन्यानंतर गणेश नवल पाटील याचा जमिनीत पुरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला तेव्हा आपल्या लाडक्या मुलाच्या देहाला पाहून त्याचे वडील नवल पाटील यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या….
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील रेल गावातील १२ वर्षीय गणेश नवल पाटील याचा १५ मार्च रोजी क्रिकेट खेळताना संशयास्पद मृत्यू झाला होता. आपल्या मुलाला तीन महिन्यांआधी झालेल्या भांडणातून मुद्दामहून छातीत बॅट मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचे वडील नवल पाटील यांनी केला होता. त्यामुळे मुलाच्या मृत्यूचे खरं कारण कळण्यासाठी अखेर अडीच महिन्यांनंतर गणेशचा जमिनीत पुरलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. फॉरेन्सिक पथक, पोलिस आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.ही संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या देखरेखीखाली इन कॅमेरा पार पडली असून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.
मित्राने छातीत बॅट मारून खून केल्याचा आरोप
आता शवविच्छेदन अहवालातून गणेशच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून, या प्रकरणामागील सत्य काय आहे?, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आपल्या मुलाचा जुन्या वादातून मित्राने छातीत बॅट मारून खून केल्याचा नवल पाटील यांचा आरोप आहे. मुलाला न्याय मिळाला म्हणून न्यायासाठी त्याचे वडिल नवल पाटील यांची गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ पोलीस ठाणे आणि एसपी कार्यालय अशी पायपीट सुरु होती.