
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातशी संबंध असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर होत आहे. केसरकर यांचे काही फोटोदेखील समोर आले आहे. याप्रकरणी पत्रकार परिषद घेत दीपक केसरकर यांनी म्हटले की, ‘अनेक नेते खरातला भेटलेले आहेत, त्यांचे फोटोही समोर आलेले आहेत. खरातशी ओळख असणे म्हणजे त्यांच्या कृत्यामध्ये सहभागी होणे असं नाही. एकाही पोलिस स्टेशनला मी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. मी कुठल्याही महिलेची आणि त्यांची ओळख करून दिलेली नाही.’
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, ‘महिलांच्या संदर्भात त्याचे जे घृणास्पद कृत्य केले याबाबत मला माहिती नाही. या प्रकणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो, तो राजकीय द्वेषा पोटी केला जातो. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आघाडीवर आहेत. यात संजय राऊत आणि इतर नेते आहेत. ज्यावेळी शिवसेनेमध्ये संघर्ष घडला, उबाठाच्या वतीने दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न उबाठाच्या वतीने झाला. त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांची बाजू महाराष्ट्रासमोर आणली, त्यामुळे त्यांचा प्रयत्न असफल झाला. महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेसोबत राहिली.’
केसरकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘मुख्य प्रवक्ता म्हणून मी केलेली कामगिरी होती, त्यामुळे हे लोक राज्यात जो असंतोष घडवून आणू पाहत होते, यात संजय राऊत यांचा समावेश होता. त्यांचा हा कट यशस्वी होऊ शकला नाही. या रागापोटी ते वेगवेगळी विधाने माझ्याबद्दल करत आहेत. जनतेच्या मनात कोणताही संशय नसावा म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहे. झालेली घटना अत्यंत घृणास्पद आहे, त्याचा मी निशेध करतो. या व्यक्तीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी माझी ठाम भूमिका आहे.’
आमदार केसरकर यांनी म्हटले की, ‘मी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर मी दोषी असलो असतो. केवळ ओळख असल्यामुळे ते करत असलेल्या वाईट कृत्याशी आपला संबंध नेऊन जोडणे हे चुकीचं आहे. हा सगळा प्रयत्न उबाठाकडून होत आहे. त्यांच्या नेत्याने मंदिराला पाण्याची लाईन आणून दिली, मंदिराला निधी दिला, तेच लोक आज आरोप करत आहेत. त्यांनी केलं तर योग्य आणि दुसरं कोणी मंदिरात गेलं तर चुकीचं असं म्हणणं चुकीचं आहे. राजकीय द्वेषापोटी हे सगळं चाललेलं आहे.’
दीपक केसरकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘मी लवकरच या संदर्भात सल्ला घेणार आहे, एकदा खरात यांच्यावर आरोपपत्र दाखल झालं की, माझी जी खोटी बदनामी केली गेली, त्याच्याबद्दल कुठली कायदेशीर कारवाई करायची याबाबत योग्य तो निर्णय मी घेईल. सार्वजनिक जीवनात ज्यांची चांगली प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न हा अतिशय चुकीचा आहे असं माझं ठाम मत आहे.’