
विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली, त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मतदान यादीतील त्रूटी दाखवून दिल्या, तसेच या सर्व त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका आणखी सहा महिने पुढे ढकलाव्यात अशी मागणी देखील यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे, दरम्यान यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
इतके कन्फ्यूज विरोधक मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नाहीत. इतके मोठे -मोठे लोक त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे? कायदा काय आहे? हे देखील माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही. पण मला वाटतं त्यांना सर्व माहीत आहे, पण केवळ आपण निवडणूक हारलो तर? यासाठी ते आधीच कारणं शोधून ठेवत आहेत, असा खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधक काल राज्यात जे निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेले होते. पण ते ज्या अधिकाऱ्यांकडे गेले होते, त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काहीच नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थेचा वेगळा कायदा आहे. त्यातून स्टॅट्यूटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे. ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे. या इलेक्शन कमिशनबाबतचे सर्व अधिकार कायद्याने त्यांना आहेत, राज्य सरकारला देखील नाहीत.
पण हे सर्व विरोधक काल जाऊन त्यांना भेटले, त्यांना भेटल्यानंतर यांच्या लक्षात आलं, आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारेंना मग काल त्यांच्याशी चर्चा करून काही तरी थारूर मातूर सांगितलं. आज पुन्हा त्यांना भेटले, तीथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही, मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी, जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे, स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं. सगळे अधिकार त्यांना आहेत, निवडणूक यादी संदर्भात ते पहिल्यांदा विधानसभा, लोकसभेची जी व्होटर लीस्ट आहे, ती आधी जारी करतात, मग त्यानंतर सर्वांना त्यावर ऑबजेक्शनची संधी दिली जाते. या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजे, मात्र असं काहीही न करता, कायदा समजून न घेता केवळ एक नरेटिव्ह सेट करायचा, असा हा सगळा प्रकार आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.