उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन, अपघात नेमका कुठे आणि कसा झाला?
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. लँडिंग दरम्यान विमान शेतात कोसळून लागलेल्या आगीत अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वाचा अपघाताचे सविस्तर कारण आणि घटनाक्रम.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या हृदयद्रावक दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ६ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे.
नेमका अपघात कुठे आणि कसा झाला?
अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला.
राजकीय वर्तुळात मोठी शोककळा
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून (DGCA) या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
अजित पवार आज बारामती तालुक्यात चार वेगवेगळ्या प्रचार सभांना संबोधित करणार होते. त्यांच्या सभेसाठी सकाळपासूनच कार्यकर्ते विमानतळाच्या परिसरात आणि सभास्थळी मोठ्या संख्येने जमले होते. मात्र, अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
