असं करून मत मिळत नाही… पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; कुणाला फटकारले?
Devendra Fadnavis On Jain Community: सध्या मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या आहेत. त्या पाहून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत सध्या पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावरून मनसे आणि जैन मुनी आमने सामने आले आहेत. मनसेने पांढऱ्या पट्ट्यांना प्रचंड विरोध केला आहे. तर जैन मुनींनी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागातील वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून कोणत्याही समाजाला आमनेसामने उभे करू नका, असं सांगतानाच असं केल्याने मतं मिळत नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मनसेला फटकारले आहे.
मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पांढऱ्या पट्ट्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. कोणीही कोणत्याही समाजाला एकमेकासमोर उभे करु नका. दोन्ही समाजांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. असं करून मत सुद्धा मिळत नाही, असा टोला लगावतानाच अनेक वेळा चर्चेत राहण्यासाठी अनेक लोक बोलत असतात. मुख्यमंत्री म्हणून या मुद्द्यावर उत्तर देण मला गरजेच वाटत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नॉर्थ कोस्टल रोडचं काम वेगात
नॉर्थ कोस्टल रोडवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नॉर्थ कोस्टल रोड हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात वेस्टर्न एक्सप्रेस व्यापणार आहे. मुंबईची ट्रॅफिक ही वेस्टर्न एक्सप्रेस वे वर जाणार असते. हा समांतर आणि सिग्नल फ्री रोड देणे गरजेचे आहे. या ठिकाणी काम दिसत आहे. हा रोडने वांद्रे वर्सोवा सिलिंक जोडला जात आहे. या रोडच्या कामाने अत्यंत वेग घेतला आहे. अशा लाटांमध्ये काम करणे कठीण असते. मात्र वेगाने काम सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंना शुभेच्छा
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. तर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिलेला पाठिंबा हे जानकर यांचं प्रेम आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.