MPSC : एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का? फडणवीसांनी थेट सांगितलं; पेपर फेरतपासणीचाही आदेश!
MPSC Paper Leak : विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्य आहे, असं माझं मत आहे. बऱ्याच गोष्टी साचत गेल्या. ज्या-ज्या वेळी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, ते काम झालेलं नाही. त्यामुळे यंत्रणेत बऱ्याच त्रुटी तयार झाल्या. अनेकदा एखादी घटना घडते आणि त्यातून आपल्याला सुधारणेची संधी मिळते, असे फडणवीस म्हणाले.

सचिन गव्हाणे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : राज्यात एमपीएससीच्या परीक्षेच्या आयोजनाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये घोळ होत आहे. पेपरफुटीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे या परीक्षा निष्पक्षपणे व्हायला हव्यात, अशी मागणी केली जातेय. याच मागणीला घेऊन राज्यभरातील अनेक विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत. पुण्यापासून ते सोलापूरपर्यंत विद्यार्थी आक्रमक झाले असून पेपरफुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, आगामी परीक्षांचे आयोजन परादर्शक पद्धतीने करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याच मागणीची दखल घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, याविषयीही माहिती दिली आहे.
यंत्रणेत त्रुटी होत्या, खबरदारी घ्यायला हवी होती
विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्य आहे, असं माझं मत आहे. बऱ्याच गोष्टी साचत गेल्या. ज्या-ज्या वेळी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, ते काम झालेलं नाही. त्यामुळे यंत्रणेत बऱ्याच त्रुटी तयार झाल्या. अनेकदा एखादी घटना घडते आणि त्यातून आपल्याला सुधारणेची संधी मिळते. गेल्या काही काळात एक घटना घडली, त्यातून उद्रेक झाला. त्यामुळे याच घटनेमुळे आपल्याला यंत्रणेत सुधारणा करण्याची संधी मिळाली. ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या परीक्षेतही आपण प्रकरण दाबले नाही. मी पोलिसांची मदत घेऊन पेपरफुटी झालीच नाही असा अहवाल आणला असता तर कदाचीत एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आणखी दोन-चार वर्षे भांडत राहिले असते. परंतु असं करून आपण मुलांना न्याय देऊ शकत नाहीत. म्हणूनच पोलिसांनी नीट तपास केला. अजूनही पेपरफुटीचा तपास केला जातोय. आपल्याला यंत्रणेत सुधारणा करण्यात रस आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घेऊन काहीही मिळणार नाही
पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन फायदा नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत. पेपरफुटीचे प्रकरण घडले त्यावेळी विद्यमान अध्यक्ष नव्हते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं अतार्किक आहे. राजीनामा घेतल्याने काही फायदा होईल असं मला वाटतं नाही, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच एमपीआससी अध्यक्षांचे पद हे शेवटी संवैधानिक आहे. एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरोधात विरोधात कुठलाही पुराव्या द्या, मी त्याची स्वतंत्र चौकशी करायला तयार आहे, अशी भूमिकाही यावेळी फडणवीस यांनी घेतली.