
Devendra Fadnavis : दिग्गज अभिनेता आमीर खान याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी आमीर खानने फडणवीस यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. राज्याचा विकास, शेती, पाणी, राजकारण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमीरने फडणवीस यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आमीर खानने विचारलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं फडणवीस यांनी दिलखुलासपणे दिली. त्या मुलाखतीत आमीर खानने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मी कधीही स्वार्थासाठी विचारांशी तडजोड केली नाही, असे फडणवीस म्हणाले. दैनिक लोकमततर्फे ही मुलाखत आयोजित करण्यात आली होती.
या मुलाखतीत, तारुण्यात आपल्यात वेगवेगळे आदर्शवाद असतात. बदल घडवून आणण्याचे आपण स्वप्न बघतो. परंतु तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाहिले 35 वर्षांपेक्षा जास्त काळापासून तुम्ही राजकाणात आहात. तुमच्या आयुष्यात तुमचे आदर्शवाद किती प्रत्यक्षात उतरले? असा सवाल आमीर खानने फडणवीस यांना केला. त्यावर बोलताना, फडणवीस म्हणाले की, आयडीयलीझमबद्दल बोलायचे झाले तर जीवनाच्या प्रवासात तुम्हाला वेळेनुसार बदलावे लागते. वेळेनुसार तुम्हाला आयडीयलीझचे सत्य समजत जाते. काळानुसार परिस्थिती बदलते. त्यानुसार निर्णयही घ्यावे लागतात, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच तुमच्यातला आदर्शवाद मात्र कधीच मरू दिला नाही पाहिजे. कारण तुमच्यातील आदर्शवाद मेला की तुमच्या व्यक्तीमत्त्वामध्ये काहीच शिल्लक रहात नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मी माझ्या आयुष्यात स्वत:चे काही नियम तयार केलेले आहेत. त्याच नियमानुसार मी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी प्रत्यक्षात प्रॅक्टिकलहीदेखील जगतो. कारण लोकशाहीत, राजकारणात तुम्ही निवडून येत असाल तर तुम्हाला हवा असलेला आदर्शवाद, बदल प्रत्यक्षात आणू शकता. मी अनेक लोक पाहिले ज्यांनी वेळेची हाक ऐकली नाही. वेळेनु सार ते स्वत:मध्ये बदल करू शकले नाहीत. त्यामुळेच ते संपून गेले, असे फडणवीस म्हणाले. तसेच मी इतिहासात मागे वळून पाहिले तर मला समजून येतं की मी ज्या विचारांना घेऊन आलो होतो, त्या विचारांना घेऊन 100 टक्के जगू शकलो नाही. मला कधी कधी तडजोड करावी लागली. माझ्या आयुष्यात मी अनेकवेळा तडजोड केली. परंतु मी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी, स्वार्थासाठी मी कधीच माझ्या विचारांशी तडजोड केली नाही. मी भविष्यातही ही तडजोड करणार नाही, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
मुलाखतीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता आमीर खान याचे कौतुक केले. तुम्ही पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तुम्ही खूप काम केले आहे. तुमच्या कामामुळे एक आदर्श निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागात तुम्ही जागृत केलेले आहे. तुम्ही त्यांना बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे, असे फडणवीस म्हणाले.