फडणवीस यांनी हेरगिरीसाठी ड्रोन पाठवले…मनोज जरांगे यांच्या आरोपाने खळबळ

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता आम्ही आंदोलन करणार आहोत. सरकार कसे कर्जमाफी देणार नाही, हे आम्ही बघतो. जेवढ्या ठिकाणी शक्य होईल तिथे बैठक घेणार आहोत. 5 सप्टेंबरपासून गेवराई मतदार संघातून घोंगडी बैठकीला सुरुवात करणार आहोत.

फडणवीस यांनी हेरगिरीसाठी ड्रोन पाठवले...मनोज जरांगे यांच्या आरोपाने खळबळ
मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस
| Updated on: Aug 23, 2024 | 5:40 PM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते अपक्ष उमेदवार उभे करणार आहेत. आता मनोज जरागे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. आमच्या मागे ईडी लावली तरी काही फरक पडणार नाही. कारण आमच्याकडे मुंबईला जायला भाड्यासाठी पैसे नाहीत. परंतु आमची हेरगिरी करण्यासाठी रात्री इकडे ड्रोन आले होते. ते ड्रोन देवेंद्र फडणवीस यांचे होते. त्यांनीच हेरगिरी करायला ड्रोन ठेवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच फडणवीस तुम्ही काहीच करू शकणार नाही, तुमच्या ड्रोनने मला गोळ्या घातल्या तरी हरकत नाही, मी नसलो तरी माझा समाज तयार आहे, असा हल्ला त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार

मनोज जरांगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता आम्ही आंदोलन करणार आहोत. सरकार कसे कर्जमाफी देणार नाही, हे आम्ही बघतो. जेवढ्या ठिकाणी शक्य होईल तिथे बैठक घेणार आहोत. 5 सप्टेंबरपासून गेवराई मतदार संघातून घोंगडी बैठकीला सुरुवात करणार आहोत. आमची भूमिका लोकांसमोर मांडणार आहोत. घोंगडी बैठकीचा समारोप कुठे करायचा याबाबत समाजाची भूमिका जाणून घेऊ. सगळ्या समाजाचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्त ताकद लावणार आहोत.

सरकारला वेळ काढायचाय….

निवडणूक लांबवून सरकारला वेळ काढून न्यायचा होता. सरकार वाटत असलेले लाडक्या बहिणीचे पैसे आमचेच आहेत. सरकार काही त्याचे घर विकून हे पैसे देत नाही. तसेच सरकार आरक्षण देत नाही. चणे आणि रेवड्या देत आहे. सगळ्यांचा रोष सरकारला झोप येऊ देत नाही. पण आमचा रोष जाणार नाही. आमचे आरक्षण ओबीसीत आहे. दिल्लीशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही.

श्रीमंत श्रीमंत होत चालला अन् गरीब गरीब होत चालला आहे. श्रीमतांना कशाला श्रीमंत करता, त्याला पायाखाली टाका. ही लढाई गरिबांची आहे. गरीब कसा मोठा होत नाही ते आपण बघू. माझी मागणी गरिबांना न्याय देण्यासाठी आहे. त्यांना आरक्षण देण्यासाठी आहे. त्यामुळे लोक इकडे येत आहे.