मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू, अंजली दमानिया यांच्या टि्वटमुळे खळबळ

Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन झालं आहे. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू, अंजली दमानिया यांच्या टि्वटमुळे खळबळ
Manali Ghanwat-Anjali Damania
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 22, 2025 | 8:33 AM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट करुन खळबळजनक आरोप केला आहे. सोमवारी राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन झालं. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अजून अस्पष्ट आहे. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत. “ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. “राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही” असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

राजेंद्र घनवट यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप आहे. या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्र्याकडे मागणी केली आहे. आज पुणे शहरातील औंध येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

राजेंद्र घनवट यांच्यावर आरोप काय?

व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हीसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपटलाल घनवट हे दोघे डायरेक्टर आहेत. राजश्री धनंजय मुंडे , राजेंद्र घनवट आजतागायत डायरेक्टर म्हणून आहेत. यांनी 11 शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. त्यांना छळून 20 कोटींच्या जमिनीचा 8 लाखात व्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.

पोपटलाल घनवट यांना आव्हान माझे आहे की, त्यांनी वाटेल तेवढे मानहानीचे गुन्हे दाखल करावे, पण त्यांचा पर्दाफाश होणारच. गृहमंत्र्यांकडे आपण कारवाईची मागणी करणार आहे. बावनकुळे यांच्याकडे या सगळ्या लोकांना पाठवणार आहे. या सगळ्यांवर सक्त कारवाई झालीच पाहीजे अशी मागणी आपण केल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्याशी या सगळ्यांचे लागेबांधे आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.