मोठी बातमी! वातावरण तापलं, धनंजय मुंडे अंजली दमानियांवर दाखल करणार फौजदारी खटला
मोठी बातमी समोर येत आहे, अंजली दमानिया यांच्याकडून सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत, या विरोधात आता मुंडे यांनी दमानिया यांच्यावर अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत, या विरोधात आता मुंडे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी दमानिया यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे, याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले मुंडे?
‘अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.’ असा इशारा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 4, 2025
दमानियांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान धनंजय मुंडे यांनी खटला दाखल करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर आता दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांना जर अब्रु नुकसाणीचा दावा दाखल करायचा असेल तर ते करू शकतात. मात्र खटला जर दाखल केला तर त्यांचीच अब्रु जाईल असं दमानिया यांनी म्हटलं आहे. माझ्या दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये तर मी एक-एक मुद्दा वाचून दाखवला असंही यावेळी दमानिया यांनी म्हटलं आहे.
काय आहेत दमानिया यांचे आरोप?
अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी मला बदनामीया म्हटलं पण त्यांनी मला पुराविया म्हटलं असतं तरी चाललं असतं, कारण मी बदनाम लोकांचे पुरावे देत आहे. बीडमध्ये दादागिरी सुरू आहे, मामींची जमीन लाटली अशा प्रकारचे आरोप दमानिया यांनी मुंडेंवर केले आहेत.