
धाराशिव मध्ये शिवसेनेत सुरू असलेली खदखद थांबायचं नाव घेत नाहीय. जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. एकनाथ शिंदे यांचे आदेश स्थानिकचे पदाधिकारी मानत नाहीत, असा आरोप करत शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील आणि नूतन जिल्हा परिषद सदस्य असलेल्या त्यांच्या मातोश्री यांनी राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्यावर दुसऱ्या गटातील
जिल्हा परिषद सदस्याला संधी दिली जाते. मात्र निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप करत शिवसेना वाढीसाठी पक्षातूनच खोडा घातला जात असल्याचा आरोप आनंद पाटील यांनी केला. जिल्हा परिषद निवडणुकीपासून तिसऱ्यांदा शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्री कानेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य आहेत. धाराशिव जिल्हा परिषद झेडपीच्या निवडणुका लागल्यापासून काही ना काही वाद सुरुच आहेत. सध्या अर्चना पाटील यांच्याकडे धाराशिव झेडपीचं अध्यक्षपद आहे. त्या भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी आहेत. उपाध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी ऊषा गायकवाड यांच्याकडे आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत सभापतीपदाच्या चार जागा होत्या.
सभापतीपदाच्या किती जागा होत्या?
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. यात भाजपच्या वाट्याला दोन सभापतीपदं, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक सभापतीपद मिळालं आहे. अर्थ व बांधकाम खात्याचं सभापतीपद भाजपच्या सिद्धेश्वर कोरे, समाजकल्याण सभापतीपद भाजपच्या विश्वास कोकणे, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी राष्ट्रवादीच्या भाऊसाहेब खरसडे व महिला व बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या पूजा शिंदे यांची निवड झाली आहे.
सभापतीपदासाठी अनेक जण इच्छुक होते
धाराशिव जिल्हा परिषदेत सभापतीपदासाठी अनेक जण इच्छुक होते. त्यासाठी फिल्डिंग सुद्धा लावली होती. त्यातूनच सभापती पदावर वर्णी न लागल्याने आनंद पाटील यांची नाराजी उफाळून आली आहे. आईसह आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता एकनाथ शिंदे धाराशिवमधील हा वाद थांबवून त्यांची कशी समजूत घालतात ते लवकरच समजेल.