महाराष्ट्रात निसर्गाचा मूड बदलला, धुळे जिल्ह्यात तब्बल तासभर गारपीट, सर्व पूर्ववत कधी होणार?

| Updated on: Mar 06, 2023 | 8:07 PM

धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने भागात गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे तब्बल एक तास इथे गारपीटचा पाऊस पडला. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय.

महाराष्ट्रात निसर्गाचा मूड बदलला, धुळे जिल्ह्यात तब्बल तासभर गारपीट, सर्व पूर्ववत कधी होणार?
Follow us on

धुळे : कांदा, कापूस यांना भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी आधीच हवालदिल झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या घरात कित्येत दिवसांपासून शेतीचा माल पडून आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अजून शेतमाल विकलेला नाही. आपल्या शेतमालाला लवकर भाव मिळेल, असं शेतकऱ्यांना वाटतंय. पण या आशेने दोन ते तीन महिने होऊन गेली तरीही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. शेतकऱ्यांसमोर या अडचणी कमी होत्या की काय, आता अवकाळी पावसाचं नवं संकट उभं ठाकलंय. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात तब्बल तासभर गारपीट झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने भागात गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे तब्बेल एक तास इथे गारपीटचा पाऊस पडला. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. दुसरीकडे नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे होळीच्या बाजारावर देखील मोठा परिणाम झालाय.

अहमदनगरमध्येही पाऊस

विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात काही काळासाठी गारवा आला. पण या पावसामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय.

कल्याण-डोंबिवली शहर धुळीच्या चादरीआड झाकोळले

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं वातावरण आहे. पुण्यात काही भागात पावसाच्या सरी पडल्याची माहिती समोर आलीय. तर मुंबई, ठाणे जिल्ह्यात दुपारी चार वाजता प्रचंड वेगाने वादळी वारे सुरु होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरं काही काळ धुळीच्या चादरीआड झाकोळली गेली.

जोरदार वाऱ्यांमुळे या दोन्ही शहरात रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने काही काळ दृश्यमानता कमी झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे धुळीचे लोट उठले होते. या वादळी वाऱ्यामूळे ठाकुर्ली उड्डाणपूला जवळील मोठी कमान रस्त्यावर कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तातडीने महापालिका अधिकारी आणि अग्निशनदलाचे कर्माचरी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पडलेली कमान हटवली.

अवकाळी पावसाचा मुक्काम किती दिवस राहणार?

राज्यात अवकाळी पावसाचा कहर कालपासून सुरु झालाय. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला धास हिरावून घेणारा असाच आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस कधी जाणार? असा प्रश्न अनेकांना सतावतोय. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढचे तीन दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे.

एक द्रोणीय स्थिती द. कोकण ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे. त्‍या प्रभावाखाली 6-9 मार्च काळात महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह हलका/मध्‍यम पाऊस पडण्‍याची शक्‍यता. 6-7 मार्चला गुजरात व मध्य महाराष्ट्रात, तर
7 मार्चला मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.