उद्धव ठाकरेंनी खरंच शिवनिका ट्र्स्टला पाण्याची पाइपलाईन दिली का? नेमकं काय घडलं होतं? अंधारेंनी संगळं सांगितलं
सध्या राज्यभरात अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चांगलंच गाजत आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांवर आरोप सुरू आहेत. दरम्यान आतापर्यंत अनेक नेत्यांचे फोटो या अशोक खरात सोबत समोर आल्यानं या नेत्यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आलं असा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंंधारे?
मागच्या दोन दिवसांपासून साप सोडून भुई थोपटण्याचं काम सुरू आहे. ज्यामध्ये असं सांगितलं जात आहे की, ठाकरेंच्या काळात शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आलं. खरचं ठाकरेंच्या काळात शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आलं का? नेमकं काय घडलं होतं? हे आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. मी तो जीआर देखील आपल्याला देऊ शकते. 2020 ला मीर गावच्या सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेत एक ठराव केला होता. आता हा ग्रामसभेचा ठराव जोडलेला आहे. पिण्याचं पाणी देणं ही माणूसकी आहे. समजा एखादा कैदी 302 च्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे, आणि जेलरने जर त्याला पिण्यासाठी पाणी दिलं, म्हणजे जेलर त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे, असं होत नाही, इथे तर आम्ही खरातला पाणी दिलच नव्हतं, असं यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ग्रामसभेचा ठराव होता. ग्रामसेभेच्या ठरावाला अनुसरून पाणी देण्याचं ठरलं होतं. किती पाणी तर प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेनं पाणी द्यायचं ठरलं होतं. याला शिफारस कोणी केली तर अर्थात ती रुपाली चाकणकर यांनी केली होती. मिरगावच्या लोकांना पाण्याची गरज होती म्हणून तेव्हाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडून हा जीआर पारीत झाला, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, परंतु हा विषयच मुख्यमंत्र्यांकडे येत नाही आता त्यानंतर ही पाण्याची पाईपलाईन जर शिवनिका ट्रस्टलाकडे वळवण्यात आली असेल तर त्याला कसं काय कोण जाबाबदार राहील? असा सवाल यावेळी अंधारे यांनी केला.
