फडणवीसांना कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा हेतू नाही; दिलीप वळसे पाटीलांची स्पष्टोक्ती

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेले प्रश्न मी पाहिले नाही आणि उत्तरही पाहिलं नाही. एसआयटीतील डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला.

फडणवीसांना कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा हेतू नाही; दिलीप वळसे पाटीलांची स्पष्टोक्ती
फडणवीसांना कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा हेतू नाही; दिलीप वळसे पाटीलांची स्पष्टोक्ती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2022 | 12:46 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना पाठवण्यात आलेले प्रश्न मी पाहिले नाही आणि उत्तरही पाहिलं नाही. एसआयटीतील (SIT) डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे. तपास करताना सर्कल पूर्ण करावं लागतं. पोलिसांनी काही प्रश्न विचारले तरी उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे. हा रुटीनचा भाग आहे. मी कायदा शिकलो कदाचित माझ्या माहितीत फरक असेल. क्रिमिनल केसेसमध्ये कुणालही इम्युनिटी नाही. फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली. केवळ माहिती घेण्यासाठी नोटीस दिली. जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा किंवा कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा संबंध नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. तसेच तपास अधिकारी त्याबाबत चौकशी करेल. त्यावरून अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे हा विषय थांबवा, असं आवाहनही दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी केलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा काल सायबर पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यामुळे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. त्याला उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी ही स्पष्टोक्ती दिली. मला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास 37 वर्ष झाले आहे. विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. सभागृहाच्या प्रथा, परंपरा आणि प्रिव्हलेज याबाबतची मला माहीत आहे. विरोधी पक्षनेत्यांनाही प्रिव्हलेज काय आहे हे माहीत आहे. सदस्यांच्या प्रिव्हलेजबाबत दुमत नाही. तुम्ही ज्या केसेस वाचून दाखवल्या त्याबाबत कुणी विचारू शकत नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

म्हणून जबाब घेतला

पण एक घटना अशी घडली, एसआयटीमधून चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग केलं गेलं. परवानगी न घेता फोन टॅपिंग केलं. याबाबत विरोधी पक्षनेत्याने सभागृहात प्रश्न मांडला. त्याआधीच आम्ही एक समिती नेमली होती. समितीच्या अहवालानंतर एक गुन्हा दाखल झाला. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास अधिकाऱ्याकडे तपासाचं काम असतं. त्याने 24 लोकांचे जवाब घेतले. त्यांना जे जे वाटलं तसा त्यांनी तपास केला. सीआरपीसीच्या 160च्या नोटीसमध्ये दुसरं काही नाही. तपास अधिकाऱ्यांना कुणालाही जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्याचा अधिकार आहे. आधी प्रश्नावली पाठवली होती. विरोधी पक्षनेत्यांना काही कारणाने उत्तर देता आलं नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्याने 160ची नोटीस पाठवली. याचा अर्थ तुम्ही जबाब द्या. पोलीस ठाण्यात घ्यायचा की घरी घ्यायची याची चर्चा झाली आणि जबाब घेतला, अशी माहितीही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या:

धक्कादायक…! खासगी शिकवणीच्या शिक्षकाने फोडला बारावी केमिस्ट्रीचा पेपर!

शेतीचं कर्ज फेडायचं कसं? नैराश्यातून तिनं जीवन संपवलं, औरंगाबादेत शेतकरी पत्नीच्या आत्महत्येनं हळहळ

Maharashtra News Live Update : महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले; पटोलेंचा रावसाहेब दानवेंना टोला