मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर आता गेले चार दिवस राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु आहेत. आधी सूर मग गुवाहाटीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (Five star hotel)राहत असलेल्या बंडखोरांवर होत असलेल्या खर्चांच्या निरनिराळ्या आकड्यांची चर्चा होते आहे. कसे 65 लाख रुपये खर्च करुन सात दिवस या हॉटेलातील रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. लाखो रुपयांची उधळण कशी चॉपर्ससाठी करण्यात येते आहे. आसाम आणि गुजरात सरकारची सुरक्षा व्यवस्था कशी या बंडखोर आमदारांच्या दिमतीला आहे, अशा निरनिराळ्या चर्चा रोज झडत आहेत. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून बंडखोरी केलेल्या प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये (50 crores each MLA) देण्यात येणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच अनेक माध्यमातही हा आकडा रंगवून सांगितला जातोय.
सध्या 50 हून अधिक आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यात शिवसेनेचे 40 हून अधिक तर 10 एक अपक्ष, शिवसेना सहयोगी आमदार असल्याचे सांगण्यात येते आहे. या प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये असा हिशोब धरला, तर गुवाहाटीत उपस्थित असलेल्या आमदारांचा आकडा हा 50 आहे. म्हणजे ही बेरीज साधारणपणे 2500 कोटींपर्यंत जाते आहे. तसेच फाईव्ह स्टार हॉटेल्स, दररोजचा जेवणखाण्याचा खर्च, वाहतूक व्यवस्था, या बंडखोरीच्या नाट्यात होत असलेला चॉपर्स आणि विमानांचा वापर त्यातून हा सगळा तीन हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
बंडखोर आमदारांच्या घोडेबाजाराची किंमत 50 कोटी हे खरे आहे का ? कुणी दिले ? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे. शिवसेना बंडखोर आमदारांचे सुरत आणि गुवाहाटी येथील हॉटेलची बिले कोण भरत आहेत ?, स्पाईस जेट विमानाचे बिल कुणी भरले ? असे अनेक प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत. याठिकाणी आयकर विभाग आणि ईडीने छापे टाकल्यास काळ्या पैशाचे स्तोत्र उघडकीस येईल असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे. त्यांच्यापूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही यात कोट्वधी रुपये आमदारांना दिल्या गेल्याचा दावा केला आहे.
सध्या गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदार लगेचच मुंबईत येतील, आणि विश्वासदर्शक ठरावावर विधानभवनात मतदान होईल, अशी शक्यता कमी आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली आहे, तर उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव असल्याने त्यांना याबबत निर्णय घेता येणार नाही, असा एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे वेगळ्या गटाचे राज्यपालांना पत्र, मग भाजपाकडून विश्वासदर्शक ठरावाची मागणी, यात आणखी काही काळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खेळ लांबणार हे नक्की आहे.
राज्य़पालांच्या आदेशानंतर विधानसभेत प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठराव आणला गेला, तरी त्याआधी भाजपाचे आमदार, शिवसेनेचे राहिलेले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना पुन्हा फाईव्ह स्टार हॉटेलात नेले जाण्याची शक्यता आहे. त्यातही दोन ते तीन दिवस पैशांचा चुराडा होईल, तो वेगळा. अशा स्थितीत हा खर्च कोट्यवधींची उड्डाणे घेणारा ठरणार आहे हे नक्की