
Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात. कृषीमंत्री असताना त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे महायुती सरकारवर मोठी नामुष्की ओढावली होती. शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या विधानामुळे तसेच विधिमंडळातील सभागृहात थेट रमी हा ऑनलाईन गेम खेळताना दिसल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोकाटे यांचे खाते बदलावे लागले. त्यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करून क्रीडामंत्र्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, आता क्रीडामंत्री असले तरीही कोकाटे यांचे मंत्रिपदच आता धोक्यात आले आहे. त्यांना प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली 2 वर्षे 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे आता कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ठोठावण्यात आलेली दोन वर्षे तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अगोदर ही शिक्षा प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावली होती. या शिक्षेला कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. आता जिल्हा सत्र न्यायालयानेही प्रथमवर्ग न्यायालयाने ठोठावलेली ही शिक्षा कायम ठेवलेली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर आता कोकाटे हे अडचणीत सापडले आहेत. त्यांचे क्रीडामंत्रिपदही धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेले हे प्रकरण 29 वर्षांपूर्वीचे आहे. 1995 साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10 टक्के आरक्षित सदनिका मिळवली होती. ही सदनिका मिळावी त्यांनी कागदपत्रांच हेराफेरी केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस टाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात आता जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता कोकाटे नेमकं काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.