Manikrao Kokate: भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष; माणिकराव कोकाटे मैदानात, म्हणाले फोडाफोडीत त्यांचं आयुष्य…Video झाला Viral
Manikrao Kokate Viral Video: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे महायुतीच्या भांडणात उतरले आहेत. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. नगरपालिका, नगरपरिषदेच्या रणांगणात महायुतीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. बाद्यापासून ते चांद्यापर्यंत महायुतीतच लाथाळ्या पाहायला मिळत आहेत.

Manikrao Kokate on BJP: चांद्यापासून ते बाद्यापर्यंत सध्या महायुतीतमधील घटक पक्षात संघर्ष पेटलेला दिसत आहेत. कोणाचा पायपूस कोणाला उरला नाही. विधानसभेत एक दिलाने उतरलेले तीनही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र एकमेकांचे कपडे काढताना दिसत आहेत. भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपविरुद्ध राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी विरोधात शिंदे सेना अशी चकमक उडालेली आहे. मित्रच शत्रू झाले आहेत. तर विरोधक मात्र शेकोटी पेटवून या वादाची मजा घेत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मरगळ झटकता आलेली नाही. मात्र महायुतीतील लाथाळ्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.
भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष
पूर्वी मंत्री असताना सिन्नरच्या गल्लीबोळात फिरत होतो मात्र आता मंत्री झाल्यामुळे मला फिरता येणे शक्य नाही. मी राज्यात कुठेही फिरलो काही बोललो कसे बोललो. तरी सिन्नरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. महाराष्ट्रात फिरत असताना मला हे जाणवलं की सर्व लढाया आपसाआपसामध्ये सुरू आहेत. म्हणजे युतीमधे जास्त लढाया आहेत, जास्त संघर्ष युतीतच आहे. आपल्याकडे थोडासा उबाठा आहे.. बीजेपी पूर्ण बाटलेली आहे इकडून फोड तिकडून फोड अशी परिस्थिती आहे. बीजेपीचे आयुष्य फोडाफोडी मध्ये चाललं आहे, अशी सडकून टीका माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. ते सिन्नरमधील प्रचारसभेत बोलत होते.
सिन्नर शहर चांगले
मी राज्यभर फिरलो. यापूर्वी अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले लोक आहेत त्यांची शहर अत्यंत वाईट आणि घाणेरडे आहेत त्यामानाने आपले सिन्नर शहर चांगले आहे. सिन्नर तालुक्यातल्या क्रीडा संकुलासाठी मी 100 कोटी घेऊ शकतो खातच माझ्याकडे आहे. मी दादांचा पट्ट्या आहे माझा शब्द पक्का असतो. पोटात एक पोटात एक असं काही नसतं. माझं खातं बदललं मला काही वाईट वाटलं नाही.मला खोटं बोलता येत नाही. मीडियाला खरं दाखवायची सवय नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी माझ्या विकास कामांमुळे ट्रॅक्टर आले, असे कोकाटे म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका
शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका. शेतकऱ्यांना 70% अनुदानावर योजना द्या. फुकट काहीच नको. फुकट दिलं की गोंधळ होतो. कुठल्या निवडणुकीला मी अद्याप पर्यंत जातीपातीचे गालबोट लागू दिले नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत असे होऊ देणार नाही. मी श्री छत्रपती शिवरायांच्या विचाराचा माणूस आहे. तीन तारखे नंतर सर्व सुरळीत होईल. मुख्यमंत्री फडणवीस, अजित दादा, शिंदे सर्व एकत्र येतील, असे सांगायला ते विसरले नाहीत.
मित्र पक्षांमध्येच नगर परिषदेच्या लढाया
राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या मित्र पक्षांमध्येच आपसात लढाया आहेत. विरोधी पक्ष केवळ नावालाच आहेत. आज आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत असलो, तोंडसुख घेत असलो तरी 2 तारखेनंतर पुन्हा एकत्र मांडीला मांडी लावून बसणार आहोत. महायुतीचे सरकार म्हणून आम्ही आणलेल्या योजना या जनतेच्या फायद्यासाठीच्या आहेत. त्यांचे श्रेय कोणा एका पक्षाचे नाही. विकासाच्या मुद्द्यावर आपण सिन्नरमध्ये आजवरची प्रत्येक निवडणूक लढवली आणि जिंकली आहे असे कोकाटे म्हणाले.
फोडाफोडीचा भाजपला काडीचा फायदा नाही
फोडाफोडीचे राजकारण आपल्याला जमत नाही. समाजकारणासाठीच मी राजकारण करतो असे सांगत मंत्री कोकाटे यांनी सिन्नर मधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मित्रपक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधताना त्यांनी भाजप पूर्णपणे बाटलेली असून केवळ फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा टोला लगावला. अगोदर माझ्या घरामध्ये भावाला ओढून फोडाफोडी केली आणि आता हेमंत वाजे यांच्या रूपाने खासदार वाजे यांचे घर फोडले. फोडाफोडीचा भाजपला काडीचाही फायदा होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यांचा देखील त्यांनी समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री शिंदे जिथे जातात तिथे ती नगरपालिका दत्तक घेत असल्याचे जाहीर करून टाकतात. आत्ताच त्यांना एवढा कळवळा का आला, असा खडा सवाल कोकाटे यांनी विचारला. सिन्नरच्या बाबतीत बोलायचे तर मी नगर विकास मंत्री म्हणून त्यांच्याकडे सातत्याने निष्क्रिय असलेल्या मुख्याधिकाऱ्याच्या बदलीसाठी हेलपाटे मारत होतो. तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र रात्रीतून त्यांना सिन्नरच्या विकासाचा कळवळा आला.
प्रत्येक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा ते उल्लेख करतात. ही योजना महायुतीची आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संकल्पनेला पाठिंबा दिला होता हे विसरून चालणार नाही याकडे कोकाटे यांनी लक्ष वेधले. जाती जातीत भांडण लावून घरफोड्या करणारा धंदेवाईक उल्लेख कोकाटे यांनी उदय सांगळे यांचे नाव न घेता केला. तुमचा डीएनए कोणता आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. विधानसभेला तुम्ही एका पक्षात गेला, नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपमध्ये आलात आणि पुढच्या विधानसभेला तुमचा पक्ष बदललेला असेल असे ते म्हणाले. सिन्नरमध्ये वाजे आणि आमचे ठरले आहे अशा वावड्या उठवल्या जात आहेत. वास्तविक आम्हा दोघांनाही मालक कोणीच नाही. एकत्र यायचेच असते तर उघडपणाने एकत्र आलो असतो. याबाबतीत अजितदादांना काय ते मी सांगितले असते.
मी मंत्री आहे. माझा उमेदवार बसवून मी दुसऱ्या उमेदवाराला का निवडून आणेल याचाही विचार गैरसमज पसरवणाऱ्यांनी करावा. मी माझे उमेदवार पडण्यासाठी नाही तर निवडून आणण्यासाठी उभे केले आहेत. खासदार वाजे त्यांचा पक्ष सांभाळत आहेत आणि मी माझ्या पक्ष वाढवत आहे असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
परिणय फुके यांची टीका
माणिकराव कोकाटे यांनी बाटलेला पक्ष का म्हटलं मला माहित नाही, रमी खेळून बोर झाले असतील म्हणून त्यांनी कदाचित भाजपवर टीका केली असावी. माणिकराव कोकाटे यांनी स्वतःचा इतिहास बघून आत्मपरीक्षण करून बोलले पाहिजे, असा टोला फुके यांनी कोकाटे यांना लगावला.
