पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई, पुणे, बुलढाण्यात पाण्यासाठी महिलांचे हंडे मोर्चे

राज्यात सरासरी जास्त पाऊस पडूनही अजून मार्च महिना उजाडला नसतानाच आता पासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात हंडे मोर्चे सुरु झाले आहेत.

पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई, पुणे, बुलढाण्यात पाण्यासाठी महिलांचे हंडे मोर्चे
water scarcity
| Updated on: Feb 05, 2026 | 5:44 PM

राज्यात यंदा सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमान होऊन देखील राज्याच्या अनेक भागात आता पासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. अनेक भागात पाण्यासाठी महिलांचे हंडे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे आतापासून पाण्याचे नियोजन केले नाही तर उन्हाळ्यात पाणी टंचाई उग्र रुप धारण करणार याची चुणूक या पाणी टंचाईतून जाणवत आहेत.पुणे, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर सारख्या भागात पाणी टंचाईची झळ जाणवत असून महिलांचे मोर्चे निघत आहेत.

रायपूर येथे महिलांचा पाण्यासाठी आक्रोश..

बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यापूर्वी गावात पाण्यासाठी महाजल तसेच जलजीवन सह विविध योजनेद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात,गावाला नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ आणि त्यातही महिलांना अधिक झळ बसत आहे. महिलांनी आपल्या दोन महिन्यानंतर पाणी मिळत असल्याचे सांगत आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पाण्याच्या मागणीसाठी शेकडो महिला आज जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंतांच्या दालनात धडकल्या. ग्रामीण पाणी पुरवठा अभियंत्यांसमोर महिलांनी आपली कैफियत मांडली आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

उल्हासनगर शहरात गेल्या 5 दिवसांपासून पाणी नाही पुरवठा होत नसल्याने मोर्चा काढला आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प 5 परिसरातील रहिवासी पाण्या अभावी नागरिक त्रस्त आहेत. यामुळे येथील राजाराम पवार यांनी संतापाच्या भरात अर्धनग्न होऊन बाईकवरून पाणीपुरवठा कार्यालयात दिली धडक आणि पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पुण्यातील प्रभाग 1 मध्ये नागरिकांचा हंडा मोर्चा

पुण्यातील कळस,गणेशनगर आणि बोपखेल परिसरात जाणूनबुजून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांनी केला आहे. पुण्यात कालच दुरुस्ती केलेली जलवाहिनी आज पुन्हा फुटल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. काही समाजकंटकांकडून मोबाईलद्वारे दिशाभूल करणारे मेसेज पसरवले जात असून यांच्यावर तात्काळ पोलीस गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रेखा टिंगरे यांनी केली आहे.

आळंदी रोडवर रस्ता रोकोचा इशारा

पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास सोमवारी आळंदी रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनात प्रभाग – १ धानोरी–कळस–लोहगावच्या नगरसेविका रेखा टिंगरे उपस्थित होत्या. गणेशनगर आणि बोपखेल भागातील मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. पुरेसे पाणी मिळावे या मागणीसाठी नागरिकांनी हंडा मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. येथील वॉल्वमन पैसे घेऊन पाणी सोडत असून पाणीटंचाईस तोच कारणीभूत आहे असा आरोपही टिंगरे यांनी केला आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून गणेशनगरमधील ३ ते ७ नंबर गल्लीला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.  “पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून आम्हाला वंचित ठेवण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे,” असा आरोप महिलांनी केला आहे. जवळपास २०० महिलांनी हंडा मोर्चा काढत आळंदी रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास सोमवारी आळंदी रस्ता पूर्णतः रोखण्यात येईल, असा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us