
Chhatrapati Sambhaji Nagar Jilha Parishad : राज्यात काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद, महापालिकेची निवडणूक पार पडली. या सर्वच निवडणुकांत बहुसंख्य ठिकाणी सत्ताधारी पक्ष वरचढ ठरले. परंतु त्या-त्या ठिकाणचे राजकीय समीकरण लक्षात घेऊन काही जिल्हापरिषदांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. आता याच सत्तास्थापनेबाबत छत्रपती संभाजीनगर चर्चेत आले आहे. येथे जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असून दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानामुळे तर या चर्चांना चांगलंच बळ मिळालं आहे.
छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषद निवडणूक ही फारच चुरशीची ठरली. या निवडणुकीत भाजपाने 23 जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 21 जागांवर विजय मिळवला. सर्वात मोठ्या ठरलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये विजयी जागांचे प्रमाण हे खूप कमी आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. या अध्यक्षपदाची निवडणुक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे या दिवशी नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजपा आणि शिंदे गटातील ही रस्सीखेच लक्षात घेऊन आता ठाकरे गटाकडून सत्तेत सहभागी होण्याच्या शक्यता पडताळून पाहिली जात आहे. तसे संकेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिले आहेत. आमचे काही सदस्य सत्तेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत, असं दानवे म्हणाले आहेत. सोबतच आमच्या सदस्यांची तशी इच्छा असली तरीही अद्याप तशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही दानवे यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. येथे भाजपाला 22 जागा जिंकता आल्या. तर शिंदे गटाने 19 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय संपादन केला. ठाकरे यांच्या शिवसेनेला एकूण 8 जागांवर विजय मिळालेला आहे. तर शरद पवार यांच्या काँग्रेसला एक, काँग्रेसला एका जागेवरच विजय मिळवता आलेला आहे.