मुंबई पालिकेवर आता शिंदे गटाचा महापौर? मोठा बदल होण्याची शक्यता, महायुतीत काय घडतंय?
मुंबई पालिकेवर लवकरच शिंदे गटाचा महापौर? मोठा बदल होण्याची शक्यता, महायुतीत काय घडतंय?

BMC Mayor Post : मुंबई महापालिकेवर सध्या महायुतीची सत्ता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यात सत्ता विभागून देण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली होती. पण महायुतीचा धर्म म्हणून शिंदे गटालाही सत्तेत सामील करून घेण्यात आले. सध्या मुंबई पालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या नेत्या रितू तावडे या आहेत. दरम्यान, आता नवी माहिती समोर येत आहे. भविष्यात शिंदे गटाचा नेता मुंबईच्या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.
महायुतीत नेमकं काय घडतंय?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेत लवकरच शिंदेंच्या शिवसेनेला महापौरपद मिळण्याची शक्यता आहे. अडीच वर्षानंतर शिवसेनेला पालिकेचे महापौरपद दिले जाऊ शकते. महायुती समन्वय समितीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून बीएमसीच्या महापौरपदाचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे.
सव्वा-सव्वा वर्षाचा नवा फॉर्म्यूला काय आहे?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या अडीच वर्षाच्या टप्प्यात पालिकेचे महापौरपद हे भाजपाकडेच असेल. त्यानंतर दुसऱ्या अडीच वर्षाच्या टप्प्या महापौर पदासाठी भाजप-सेनेत सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरवण्यात आलेला आहे. म्हणजेच दुसऱ्या अडीच वर्षाच्या टप्प्यात पहिल्या सव्वा वर्षात शिंदे गटाकडे महापौरपद असेल. त्यानंतर सव्वा वर्षात पुन्हा एकदा भाजपाकडे महापौरपद दिले जाणार आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेला तस शब्द देण्यात आला होता, अशी माहिती आता समोर येत आहे.
सध्या महायुतीपुढे कोणतं संकट, शिंदे गट काय करणार?
दरम्यान, सध्यातरी भाजपाच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर आहेत. महापौरपद मिळाल्यापासून त्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. पावसामुळे झाडे पडल्यामुळे, मॅनहोलध्ये पडून मृत्यू झाल्याने त्यांच्यावर टीका झाली. पावसाळ्याआधीची कामे पूर्ण ताकदीने करण्यात आली नाहीत. तसेच योग्य नियोजन न केल्याने पावसाळ्यात मुंबई तुंबली असा आरोप करण्यात आला. आता भविष्यात शिंदे गटाला महापौरपद दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता सत्यात उतरली तर शिंदे गट नेमकं काय करणार? मुंबईच्या विकासासाठी कोणती पावलं उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.