शेतकऱ्यांवर कांदा पुन्हा रस्त्यावर फेकण्याची वेळ, दरात प्रचंड घसरणीमुळे शेतकरी संतप्त

| Updated on: Jan 25, 2024 | 4:35 PM

Farmer News | गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे दर आता हजाराच्या खाली आले आहे.

शेतकऱ्यांवर कांदा पुन्हा रस्त्यावर फेकण्याची वेळ, दरात प्रचंड घसरणीमुळे शेतकरी संतप्त
सोलापूर बाजार समितीसमोर आंदोलन करताना शेतकरी
Follow us on

उमेश पारीक, येवला, सोलापूर, दि.25 जानेवारी 2024 | कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत आहे. निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे दर आता हजाराच्या खाली आले आहे. कांदा आता सात महिन्यानंतर नीच्चांकी दरावर आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता हजार ते १२०० रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांदा पिकातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे कांद्यावर लादलेली निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जात आहे.

येवला बाजारात घसरण

येवला बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळत आहे. कांद्याचे सरासरी भाव 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटलवर आले आहे. गेल्या आठवड्यात 1600 रुपये तर आज सरासरी 800 ते 950 रुपये भाव मिळत असल्याने कांदा तोट्यात विक्री करावा लागत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांद्याला जास्तीत जास्त 1065 सरासरी 950 तर कमीत कमी 400 रुपये बाजार भाव मिळाला आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव घसरत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी देखील कांदा व्यापारी करताना दिसत आहे.

सोलापुरात शेतकरी आक्रमक

सोलापुरात कांद्याचे दर घसरले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरच रस्त्यावर कांदा फेकत निषेध केला. तसेच शेतकरी बाजार समितीच्या गेट समोर आंदोलन करत आहे. कांद्याला 1 ते 2 रुपयेपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. बाजारात कांदा विक्रीसाठी आणल्यानंतर कवडीमोल भाव मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकरी दुसऱ्या पिकांकडे

कांदा हा नगदी पीक मानला जातो. त्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करतात. मात्र यंदा कांदा पट्टा असलेल्या या भागात हरभरा आणि ज्वारीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून हजारो शेतकऱ्यांनी कांद्या अवैजी हरभरा आणि ज्वारीची लागवड केली आहे. कांद्याच्या भावात सतत होणारी घसरण, केंद्र शासनाचा कांद्या बाबत धरसोडीचं धोरण आणि कांदा पीक घेण्यासाठी वाढत चाललेला खर्च आदी कारणामुळे कांदा नगदी पीक असताना त्याला सोडून शेतकरी आता इतर पिकाकडे वळू लागल्याचे चित्र आहे .