कोरोनामुळे पिता-पुत्राचा एकाच दिवशी मृत्यू, गावाचा आणि कुटुंबाचा आधार हरपला

| Updated on: May 13, 2021 | 10:12 AM

गावाच्या संपूर्ण विकास प्रक्रियेत सुरेश गमरे यांचे योगदान मोलाचे ठरले.  | Coronavirus Father and Son died

कोरोनामुळे पिता-पुत्राचा एकाच दिवशी मृत्यू, गावाचा आणि कुटुंबाचा आधार हरपला
Follow us on

गुहागर-रत्नागिरी: गुहागर तालुक्यातील चिखली येथील वडील आणि मुलाचा कोरोनामुळे (Coronavirus) एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब निराधार झाले असून चिखली गावावर शोककळा पसरली आहे. (Father and Son died on same day due to Coroanvirus)

चिखली बौध्दवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व चिखली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेश महादेव गमरे यांचे कोरोनाने दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा विवाहित मुलगा सुरज यालाही कोरोनाची लागण झाल्याने हे दोघेही कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत होते. मात्र, सकाळी वडिलांचा तर संध्याकाळी मुलाचा अशा दोघांचाही उपचारादरम्यान, मृत्यू झाला. सुरेश गमरे हे रिक्षाचालक. चिखली कारुळ फाट्यावर त्यांचा गेली 20 वर्षे रिक्षा व्यवसाय होता. यातूनच ते आपल्या कुटुंबाची गुजराण करायचे. चिखली ग्रामपंचायतीचे ते सदस्यही होते.

गावाच्या विकासासाठी ते नेहमी धडपड करायचे. गावामध्ये कोणत्याही वाडीत सार्वजनिक सत्यनारायण पूजा किंवा एखादा कार्यक्रम असला तरी जात, भेद न ठेवता आलेल्या निमंत्रणाला मान देऊन त्यामध्ये ते सहभागी व्हायचे. सुरेश गमरे यांचा वृध्द आई, पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. एक मुलगा अशक्त असून त्याचे व मुलीचा अद्याप विवाह झालेला नाही. दुसरा मुलगा सूरज हा नोकरीनिमित्त दुबईला होता. मात्र, गेल्यावर्षी कोरोना आपत्तीपासून तो गावीच होता. त्याचा 6 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.

कुटुंबाचा सारा भार वडील व मुलावर असतानाच नियतीने घातलेला हा घाला संपूर्ण चिखली गावाला धक्का देणारा ठरला आहे. गावाच्या संपूर्ण विकास प्रक्रियेत सुरेश गमरे यांचे योगदान मोलाचे ठरले.  मात्र, कोरोना आजाराने त्यांचा बळी गेला. वडील गेले पण कमावता मुलगाही या कुटुंबाने गमावला. गमरे कुटुंबाची परिस्थिती खूपच बेताची झाली आहे. घरात कमावता कोणीही नसल्याने या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.

पाणी योजनेचे स्वप्न पूर्णत्वास

चिखली गावातील काही वाड्यांना पाण्याची मोठी झळ बसते. याकरीता ग्रामपंचायत स्तरावर पाणी योजना राबविण्याची सुरेश गमरे यांचे स्वप्न होते. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले आणि पाणी योजना मार्गी लागली. याचे श्रेय त्यांना जात असून त्यांचे स्मरण म्हणून पाणी योजनेच्या विहीर किंवा साठवण टाकीला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ संदीप मांडवकर यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

(Father and Son died on same day due to Coroanvirus)