
सतत होणारे बलात्कार, विनयभंग, महिलांवर होणारे अत्याचार पाहता नक्की कोणतं ठिकाण महिलांसाठी चांगलं आहे? असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात नक्की येत असेल. मुंबई महिलांसाठी सुरक्षित शहर आहे… असं म्हटलं जातं. पण याच मुंबईमध्ये महिला पायलटचा विनयभंग होतो. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महिला पायलटचा धावत्या कॅबमध्ये विनयभंग झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. गुरुवारी रात्री अशी धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मुंबई खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी एक 28 वर्षीय महिला पायलट सीएसएमटी स्थानकावरुन स्वतःच्या घरी निघाली होती. पतीला भेटल्यानंतर त्याने महिला पायलटसाठी कॅब बूक केली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर कॅब ड्रायव्हरने अचानक रस्ता बदलला. पुढे गेल्यानंतर त्याने कार थांबवली आणि दोन अन्य पुरुषांना कॅबमध्ये बसवलं.
एक पुरुष पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसला. तर दुसरा पुरुष मागे महिला पायलटच्या बाजूला बसला. दोन अनोळखी पुरुष मध्येत कारमध्ये बसल्यामुळे महिला पायलट घबरली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरु केली. अशात एका पुरुषांने ओरडू नकोस म्हणून धमकी दिली. तर अन्य एका पुरुषाने महिला पायलटला वाईट स्पर्ष केला.
एवढं सगळ घडत असताना देखील ड्रायव्हर शांत बसून फक्त गाडी चालवत होता. सुदैवाने रस्त्यावर पोलिसांचा नाकाबंदी पाहून ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला. तेव्हा दोन्ही पुरुष गाडीतून उतरले आणि फरार झाले. त्यानंतक ड्रायव्हरने महिला पायलटला घरी सोडलं. उतरल्यानंतर पीडित महिलेने ड्रायव्हरला जाब विचारला. पण तो काहीही बोलला नाही.
याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून दोन आरोपींचा शोध अद्याप सुरु आहे. पोलीस सध्या याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. पण महिलांसाठी खरंच मुंबई सुरक्षित आहे का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.