IND vs SLXI: सराव सामन्यासाठी प्लेइंग 11 का नसते? भारत श्रीलंका सामन्यासाठी नेमका नियम काय? जाणून घ्या
भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यात तीन दिवसीय सराव सामना सुरू आहे. या सामन्याला सुरूवात झाली असून प्लेइंग इलेव्हनचा काही नियम लागू असल्याचं दिसत नाही. त्यामुळे सराव सामन्यात नेमकं असतं तरी काय? समजून घेऊयात सोप्या शब्दात

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघ तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघाला पुरेशी विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे सराव सामना खेळण्याच निर्णय घेतला आहे. शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने या सामन्याची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर आहे. पण असं असलं तरी शुबमन गिल इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फलंदाजीला उतरू शकतो. त्यामुळे सराव सामन्यासाठी प्लेइंग 11 निवडण्याचा नियम काय? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. सराव सामन्यांचे नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांपेक्षा थोडे वेगळे असतात. नो बॉल, चौकार आणि षटकार वगैरे तसंच असतं. पण प्लेइंग 11 बाबत थोडं वेगळं असतं. सराव सामन्यात कर्णधारावर प्लेइंग 11 निवडीसाठी कोणताही दबाव नसतो.
संघातील सर्व खेळाडूंना फलंदाजीची संधी
भारत आणि श्रीलंका इलेव्हन सराव सामन्यात संघातील सर्व खेळाडू फलंदाजी करू शकतात. कर्णधाराला प्लेइंग 11 देण्याची गरज नसते. त्यामुळे 15 फलंदाज फलंदाजीसाठी उतरू शकतात. या माध्यमातून खेळाडूंची चाचणी घेता येते. इतकंच काय तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होते. कर्णधाराच्या इच्छेनुसार सर्व खेळाडूंना गोलंदाजी देऊ शकतो. बाद झालेल्या फलंदाजाला पुन्हा खेळण्याची संधी मिळू शकते. इतकं काय तर एखादा खेळाडू बाद झाला नाही तरी त्याला तंबूत बोलवू शकतो आणि नव्या फलंदाजाला पाठवू शकतो. या सामन्यात फलंदाजांनी कितीही धावा केल्या आणि गोलंदाजाने कितीही विकेट घेतल्या तरी फरक पडत नाही. कारण त्याची कुठेच नोंद होत नाही. सामना म्हणून त्याची गणनाच होत नाही. त्यामुळे या सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचे नियम लागू होत नाही.
10 खेळाडू बाद झाल्यानंतरही फलंदाजी मिळते का?
सराव सामन्यात जर 10 फलंदाज बाद झाले, तर तो डाव तिथेच संपतो. जर संघात एकूण 15 खेळाडू आलटून पालटून खेळले , तरीही 10 खेळाडू बाद होण्याचा नियम लागू होतो. म्हणजेच एका वेळी मैदानावर 10 पेक्षा जास्त गडी बाद होऊ शकत नाहीत. एखाद्या सेट झालेल्या फलंदाजाने 50 किंवा 100 धावा केल्या, तर त्याला बाद न होताच माघारी बोलावले जाते, जेणेकरून 12 व्या किंवा 13 व्या खेळाडूला फलंदाजीचा सराव मिळेल. दुसरीकडे, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मात्र संघातले इतर कोणतेही 11 खेळाडू आलटून-पालटून करू शकतात.
