
मुंबईच्या दहीसर पूर्व परिसरातील जनगल्याण इमारतीत आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी (7 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता येथे 24 मजली इमारतीला आग लगली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून शेवटी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच ते सहा नागरिक गंभीर जखमी आहेत. दरम्यान, ही दुर्घटना झाल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दहिसर पूर्व भागात जनकल्याण नावाची एसआरए इमारत आहे. ही इमारत एकूण 24 मजली आहे. याच इमारतीत अचानक आग लागली. आगीची घटना घडताच तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाने कोणताही विलंब नकरता आग विझविण्यास सुरुवात केली. तसेच आगीत सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितठिकाणी हलविण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले. या काळात नागरिकांना तत्काळ सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तरीदेखील खबरदारी म्हणून या परिसरात पोलीस, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत.
दहिसरमधील जनकल्याण इमारतीवर आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे सात फायर इंजिन, 3 जम्बो टँकर, 2 ऑटो वॉटर टँकर, 1 ब्रिथिंग अपरेटस व्हॅन, 1 हाय प्रेशर पंप, एक ALP, एक टर्बनल लँडर, 1 HRFFV, 1 WQRV आदी उपकरणे घटनास्थळी नेण्यात आले आणि युद्धपातळीवर आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आगीवर दुपारी 4 वाजून 32 मिनिटांनी नियंत्रण मिळविण्यात आले. आग लागल्याचे समजताच जनकल्याण इमारतीतील विजेचा पुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच इमारतीच्या अंतर्गत असलेली आग विझविण्याची यंत्रणा सक्रिय करण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. लोकांनी इमारतीच्या खाली मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सध्या जखमींवर उपचार केले जात आहेत. आग नेमकी का लागली? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र इमारतीतील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लवकरच या घटनेची चौकशी करून आगीचे नेमके कारण समोर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.