
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक विमानांची उड्डाने रद्द झाली आहे. एअर इंडियाने प्रवाशांसाठी एडवाइजरी केली आहे. त्याचवेळी अमरावतीमधून वेगळाचा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल न मिळाल्यामुळे अमरावतीवरुन मुंबईकडे येणारे विमान रद्द करण्यात आले. विमानामध्ये पेट्रोल भरणारे टँकर अमरावती विमानतळावरील मातीत फसले. यामुळे विमानात पेट्रोल भरता आले नाही. पर्यायाने अमरावती ते मुंबई विमान फेरी सोमवारी ऐनवेळी रद्द करण्यात आली. यामुळे त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला.
अमरावती विमानतळावरून नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास ७४ प्रवासी विमानाने मुंबईला जाणार होते. अमरावती विमानतळावर नेहमी टँकरद्वारे विमानात पेट्रोल भरले जाते. मात्र, सोमवारी पेट्रोलचा टँकर मातीत फसला. यामुळे नियोजित वेळेत विमानात पेट्रोल भरता आले नाही. अमरावतीत विमानतळ थाटामाटात सुरु करण्यात आले होते. परंतु विमानतळावर पेट्रोल भरण्याची सुविधा सुरु केली गेली नाही.
मुंबईकडे जाणारे प्रवाशी विमानतळावर पोहचले. सर्व प्रक्रिया पार पडली. त्यानंतर विमानाच्या पायलटने सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली. प्रवाशांनी आपले सीटबेल्ट सुद्धा बांधले. याचदरम्यान पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगितले. पेट्रोल वेळेत मिळाले नाही, आता सायंकाळ झाल्याने आणि नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार नसल्याचे पायलटने प्रवाशांना सांगितले. त्यानंतर अनेक प्रवाशांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घातला. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही.
मुंबईत दोन दिवसांपासून सुरु आहे. परिणामी अनेक विमानांचे उड्डान सोमवारी रद्द झाले. एयर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटकडून विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइट शेड्यूलचे ऑनलाइन अपडेट पाहण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांसाठी आमची टीम विमानतळावर सतत कार्यरत आहे, असे या कंपन्यांनी म्हटले आहे. दरम्यान, विमानांची उड्डाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.