कल्याणकर घेणार मोकळा श्वास; अखेर 38 वर्षानंतर आधारवाडी डंपिंग बंद

| Updated on: May 26, 2021 | 1:35 PM

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आधारवाडी येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आलं आहे. (Four lakh to breathe easy in Kalyan with dumping ground closed)

कल्याणकर घेणार मोकळा श्वास; अखेर 38 वर्षानंतर आधारवाडी डंपिंग बंद
kalyan dumping ground
Follow us on

कल्याण: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आधारवाडी येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आलं आहे. काल 25 मेपासूनच हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आल्याने चार लाखाहून अधिक कल्याणकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. तसेच महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी आज दुपारी या डंपिंगची पाहणी करणार आहेत. (Four lakh to breathe easy in Kalyan with dumping ground closed)

कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्थापना 1983मध्ये झाली होती. तेव्हापासून म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी येथील डंपिगवर कचरा टाकला जात होता. या ठिकाणी दररोज 570 मॅट्रीक टन कचरा टाकला जात होता. संपूर्ण कल्याण, डोंबविलीतील कचरा या डंपिंगवर टाकला जात असल्याने या ठिकाणच्या नागरिकांच्या नाकीनऊ आले होते. त्यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास होत होता. अस्थमा रुग्णांनाही त्याचा मोठा त्रास होत होता. डंपिगच्या कचऱ्यांना लागणाऱ्या आगीमुळे होणाऱ्या धुराचाही अनेकांना त्रास होत होता. कुबट वासाने तर अनेकांना डोकेदुखीचाही त्रास होत होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी होत होती.

कोर्टाकडून दखल

महापालिका सभागृहातही या भागातील नगरसेवकांनी डंपिंग बंद करण्याची अनेकदा मागणी केली होती. त्यानंतर डंपिंग बंद करण्यासाठी कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण राष्ट्रीय हरीत लवादाकडेही गेले होते. कोर्टाने याचिकेची दखल घेऊन आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश दिले होते. महापलिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मागच्या वर्षी पदभार स्विकारताच मे 2020 मध्ये आधारवाडी डंपिंग बंद करण्याचा निश्चय केला होता. मात्र कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. परंतु, डंपिंगमध्ये अधिक कचरा जाऊ नये म्हणून महापालिकेने मे 2020 पासून शून्य कचरा मोहीम राबवली आहे.

कचरा नष्ट करणार

दरम्यान, आधारवाडी डंपिंग बंद करण्यात आल्याने आता डंपिंगचा कचरा नष्ट करण्यात येणार आहे. बायो मायनिंग पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. भिवंडीतील एका गावातील दगडखाणीत कचरा नेऊन त्यावर बायो मायनिंगची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी 137 कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला राज्य सरकारने मान्यता दिली असून तज्ज्ञांच्या समितीची मंजुरी मिळताच ही प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उंबर्डेतही प्रक्रिया करणार

आधारवाडी डंपिंगमधील 200 टन कचऱ्यावर उंबर्डेच्या घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर बारावे प्रकल्पात 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिवाय आयरे, उंबर्डे, कचोरे आणि बारावे आदी बायोगॅस प्रकल्पातही 50 टक्के ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Four lakh to breathe easy in Kalyan with dumping ground closed)

 

संबंधित बातम्या:

मस्तच! पुण्यापाठोपाठ ठाणेही सावरतंय; ठाण्यात 76 टक्के खाटा रिक्त

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डोंबिवली सज्ज; 70 बेड्सचा बालरोग विभाग सुरू करणार

रस्त्याच्या पलिकडचा बॉल पकडण्याचा प्रयत्न, कचऱ्याच्या ट्रकने चिमुकल्याला चिरडलं

(Four lakh to breathe easy in Kalyan with dumping ground closed)