महाराष्ट्रातील ‘या’ 8 गावांच्या नागरिकांचा थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा, नेमकं प्रकरण काय?

आमगाव नगर परिषदेचा प्रश्न प्रलंबित असल्याने अनेक नागरिकांची कामे होत नसल्याने आणि अनेक योजनांपासून नागरिक वंचित राहत असल्याने येथील 8 गावातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील या 8 गावांच्या नागरिकांचा थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
lok sabha election schedule 2024
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 03, 2024 | 4:34 PM

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. या लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षांचा जोरदार प्रचारही सुरु झाला आहे. असं असताना महाराष्ट्रातील 8 गावांच्या गावकऱ्यांनी थेट मतदानावर बिहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषदेचा गेल्या 10 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत राज्य शासनातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सादर करण्यात आली आहे. पण या याचिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय लागत नसल्याने आमगाव येथील नागरिकांनी आमगाव नगर संघर्ष समिती स्थापन करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. या बहिष्काराच्या निर्णयावर आज आमगाव येथील तहसील कार्यालयामध्ये सभा घेण्यात आली.

आमगाव नगर परिषदेचा प्रश्न प्रलंबित असल्याने अनेक नागरिकांची कामे होत नसल्याने आणि अनेक योजनांपासून नागरिक वंचित राहत असल्याने येथील 8 गावातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने आज तहसील कार्यालय येथे सभा घेण्यात आली. नागरिकांनी बहिष्कार करू नये. सर्वसामान्यांचा हक्क आहे. मतदान बजावण्याचा याबाबत आपण हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याचे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आलेला आहे.

काही नागरिकांचा बहिष्कारास विरोध

एका बाजूला आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या 8 गावातील नागरीक हे बहिष्कार करण्यातच्या बेतात आहेत. मात्र स्थानिक पातळीवर अनेक पक्षांचे समर्थक याला विरोध दर्शवित असल्याचं दिसून आलं आहे. कारण हा प्रश्न राज्य शासनाच्या संबंधित आहे. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस आपण सर्व मिळून बहिष्कार टाकू, अशी भूमिका काहींनी मांडली आहे. त्यामुळे आता याबाबत कोणता निर्णय प्रशासन लावतो आणि नागरिक निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर पोलीस प्रशासनाने हेतू पुरस्कर नागरिकांना मतदानापासून वंचित केल्यास योग्य कारवाई करणार असल्याचे फक्त निर्देश दिले आहेत. आता या आठ गावातील नागरीक काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.