दारू पिणं सोडलं…! IPL 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूचा खुलासा, का ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक फ्रेंचायझी आपल्या संघाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. असं असताना टीम इंडियाचे एका खेळाडूने मोठा खुलासा केला आहे. त्याने दारू पिणं सोडल्याचं सांगितलं आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेत जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून अनेक खेळाडू मैदानात उतरणार आहे. पण ही स्पर्धा दोन महिने असल्याने खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न ऐरणीवर असतो. त्यामुळे खेळाडूंना फॉर्मसोबत फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करावं लागतं. अन्यथा स्पर्धेतील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वाढते. असं असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने फिटनेससाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्याने दारू पिणं सोडलं आहे. आता आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्याचं स्वप्न आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून युजवेंद्र चहल आहे. त्याने आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेतला आहे. त्याने सांगितलं की, दारू पिणं पूर्णपणे सोडलं आहे. आता फक्त फिटनेस लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याने हा खुलासा दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या युट्यूब चॅनेलवर केला.
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी युजवेंद्र चहलने सांगितलं की, ‘मी दारू पिणं पूर्णपणे सोडलं आहे. जवळपास सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. आता मी 35 वर्षांचा झालो आहे. यासाठी जास्तीत जास्त सक्रिय राहण्याचा प्रयत्न आहे. मी माझ्या संघाला 150 टक्के देऊ इच्छित आहे. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून माझी अशी इच्छा आहे की, आयपीएलमध्ये लोकांनी माझ्याकडून काही शिकावं.’ युजवेंद्र चहलच्या मते आता शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मैदानात चांगली कामगिरी करता येईल. चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. पण आतापर्यंत एकही आयपीएल जेतेपद मिळवू शकलेला नाही.
आयपीएल स्पर्धेत युजवेंद्र चहल हा पंजाब किंग्सचा भाग आहे. मेगा लिलाव 2025 मध्ये त्याच्यासाठी पंजाब किंग्सने बोली लावली होती. आता पंजाब किंग्सकडून दुसरं पर्व खेळणार आहे. मागच्या पर्वात पंजाब किंग्स संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पण आरसीबीकडून फक्त 6 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. याबाबत चहलने निराशा व्यक्त करत सांगितलं की, अंतिम फेरीत आम्हाला मार्को यानसेनची उणीव भासली. तो या संघाचा भाग नव्हता. जर तो असता तर आम्ही नक्कीच विजेते असतो. मागच्या पर्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी मार्को यानसेन दक्षिण अफ्रिका संघात सहभागी होण्यासाठी लवकर गेला होता.
