ट्रकमधून आदिवासी विद्यार्थ्यांची वाहतूक, श्वास कोंडल्यानं प्रकृती गंभीर

| Updated on: Sep 25, 2022 | 2:21 PM

परत येत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले. गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली. त्यामुळे तातडीनं सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.

ट्रकमधून आदिवासी विद्यार्थ्यांची वाहतूक, श्वास कोंडल्यानं प्रकृती गंभीर
क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ट्रकमध्ये कोंबून वाहतूक
Image Credit source: t v 9
Follow us on

शाहिद पठाण, Tv9 मराठी प्रतिनिधी, गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. आदिवासी शाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याची माहिती समोर आली. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदार पणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: काही विद्यार्थी बेशुद्ध पडले. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली.

ट्रकमध्ये 120 मुला-मुलींना अक्षरश: कोंबले होते. ते गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी नेले होते. तिथून परतत असताना संबंधित प्रकार घडला.

एका मुलीची प्रकृती गंभीर

परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले. गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली. त्यामुळे तातडीनं सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

मुख्याध्यापक निलंबित

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळा मजितपूर प्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलंय. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी हे आदेश दिलेत. आदिवासी मुलांना अशा पद्धतीने घेऊन जाणे चुकीचे असल्याचे सांगत आदिवासी मंत्र्यांनी या प्रकरणी कारवाईचे निर्देश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

या घटनेची नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांना अशाप्रकारे ट्रकमधून वाहतूक करणे चिंताजनक बाब आहे. गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संघटनेची संपूर्ण चौकशी करून तीन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत.