
देशात इंधनटंचाईच्या चर्चेनं नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर आणि इंधन साठवण्यास सुरुवात केली असून पेट्रोल पंपांसमोर रांगा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच कच्च्या तेलाचा, इंधनाचा आणि एलपीजीचा साठा जाहीर केली. इंधनटंचाईच्या अफवेवर सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतर हळूहळू पेट्रोल पंपांवरील रांगा ओसरू लागल्या आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रत्नागिरीत पेट्रोल पंप सुरळीत सुरू असून इथं गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या होत्या. आज मात्र या रांगा कमी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पेट्रोल साठा पुरेशा प्रमाणात असल्याचं प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
रत्नागिरीतील पेट्रोल पंपांवरील परिस्थिती सामान्य असून पेट्रोल वाटपासंदर्भातदेखील कुठलीही मर्यादा नाही. तर नागपुरातही हेच चित्र पहायला मिळत आहे. पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे नागपुरातील पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या. आज मात्र पेट्रोल भरणाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे. तरी नागपुरात दुचाकीला 200 रुपये तर चारचाकी वाहनाला 1500 रुपयांपर्यंतच पेट्रोल दिलं जात आहे. कोल्हापुरातील परिस्थितीही पूर्वपदावर येत आहे. शहरासह उपनगरातील पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरू आहेत. पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची संख्यादेखील कमी झाली आहे. नागपुरातही दुचाकीसाठी 200 रुपयांपर्यंत आणि चारचाकीसाठी दोन हजार रुपयांपर्यंतची मर्यादा कायम आहे.
देशात 60 दिवस पुरेल इतका तेलसाठा असून आठ लाख टन म्हणजेच एक महिन्याच्या एलपीजी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असं केंद्र सरकारने गुरुवारी स्पष्ट केलं. पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे घबराट निर्माण करून इंधन खरेदी करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्पर चालवलेली ही मोहीम असल्याने तिला बळी पडू नका, असं आवाहनदेखील सरकारने केलं आहे. इराणने भारतासह चीन, रशिया, इराक, पाकिस्तान या मित्रदेशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यावसायिक वाहतूक करण्यास सूट दिली आहे. देशभपातील सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा असून ते सामान्यपणे कार्यरत आहेत. पेट्रोल किंवा डिझेलचं रेशनिंग केलं जात नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आयात करण्यास अडचणी येत असल्या तरी भारताला सध्या जगभरातील 41 हून अधिक पुरवठादारांकडून कच्चे तेल मिळत आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली.